राजीव सातव भविष्यात महाराष्ट्राचा नेता म्हणून दिल्लीत उभं राहणारं नेतृत्व होतं – संजय राऊत

मुंबई : वृत्तसंस्था । राजीव सातव भविष्यात महाराष्ट्राचा नेता म्हणून दिल्लीत उभं राहणारं नेतृत्व होतं  अशी श्रद्धांजली शिवसेना  नेते खासदार संजय राऊत यांनी अर्पण केली .

खासदार राजीव सातव यांच्या निधनाने काँग्रेसला धक्का बसला आहे. दिल्लीत महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे राजीव सातव कोरोनाची लागण झाल्यानंतर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल झाले होते. लवकरच ते पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, फुफ्फुसात संसर्ग झाल्यानं त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. रविवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.“राजीव सातव तू हे काय केलेस? राष्ट्रीय राजकारणात तुझ्याकडून खुप अपेक्षा होत्या..तुझं हे असं जाणं भयंकर वेदनादायक आहे…चार दिवसापूर्वीच व्हिडीओ कॉलवर आपण नि:शब्द हाय हॅलो केले..लवकरच बाहेर येण्याची तुझी विजयी मुद्रा माझ्या डोळ्यासमोर आहे..तुला श्रद्धांजली कोणत्या शब्दात वाहू?”.

“राजीव सातव यांचं दुःखद निधन हा फक्त काँग्रेस पक्षावर आघात नाही. महाराष्ट्रचं खूप मोठं नुकसान झालं आहे. राष्ट्रीय राजकारणामध्ये राजीव सातव हे महाराष्ट्राचे नेतृत्व करत होते, काही वर्षापासून प्रस्थापित होत होते. दुसऱ्या पक्षात असले तरीही सर्वांचे त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार होत असताना दिल्लीतील काँग्रेस नेत्यांच्या मनात काय आहे यासाठी आमच्यात अनेकदा चर्चा होत होती. सरकार व्हावं यासाठी राजीव सातव दिल्लीच्या वर्तुळात शर्थीने प्रयत्न करत होते. पाच दिवसांपूर्वी आमचा व्हिडीओ कॉल झाला. त्यांना बोलता येत नव्हतं, पण त्यांनी मला हाताने विजयी मुद्रा दाखवत लवकर बरे होऊन भेटतो असं सांगितलं होतं,” असं संजय राऊत यांनी  म्हटलं.

“राजीव सातव यांच्या जाण्याने फक्त काँग्रेस पक्षाचं नाही तर देशाच्या राजकारणात महाराष्ट्राचा प्रमुख स्तंभ कोसळला आहे. राज्यसभेत ते काँग्रेसची बाजू चांगल्या पद्धतीने मांडंत होतं. त्यांचे जाणे दुर्दैवी आहे. भविष्यात महाराष्ट्राचा नेता म्हणून दिल्लीत उभं राहणारं जे नेतृत्व होतं त्यात राजीव सातव यांचा चेहरा मला नेहमी दिसायचा. राहुल गांधी यांच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर मी राजीव याच्याशी बोलायचो,” असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान राजीव सातव यांच्यावर सोमवारी हिंगोलीत अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती विश्वजीत कदम यांनी रुग्णालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली

Protected Content