येत्या 5 ते 6 दिवसात शाळा कॉलेज संदर्भात निर्णय

 

पुणे: वृत्तसंस्था । शाळा आणि कॉलेज सुरू करण्यासंदर्भात 5 ते 6 दिवसात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

 

राज्यात आणि देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असताना मंदिर उघडण्याची घाई नको. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंदिंर सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेतील, असं राजेश टोपे म्हणाले.

 

शाळा आणि कॉलेज सुरु करण्यासंदर्भात 5 ते 6 दिवसांमध्ये निर्णय घेण्यात येईल. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभाग कुलगुरुंच्या संपर्कात आहे. कुलगुरु त्यांच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भातील अहवाल शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठवतील. साधारणपणे येत्या पाच ते सहा दिवसात निर्णय होईल. शालेय शिक्षण विभाग आणि टास्क फोर्स यांची चर्चा होऊन शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

 

कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असतांना मंदिरं सुरू करण्याची घाई नको. आपण वेट आणि वॉच करत आहोत याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

 

सात जिल्ह्यामध्ये कोरोना संख्या जरी वाढली असली तरी काळजी वाढवी अशी परिस्थिती नाही. मात्र आमचं लक्ष आहे त्यावर,इकडे लसीकरण वाढवण्याचा विचार आहे. डेल्टा व्हेरियंटमुळे जरी संक्रमण होत असले तरी त्याची लक्षणं सौम्य आहेत, मात्र, डेल्टा प्लस वेरिएंटमध्ये संक्रमण अधिक करण्याची क्षमता आहे, असं राजेश टोपे म्हणाले.

 

लस घेतल्यानंतर कोरोना होणार नाही, असं समजू नये. संसर्ग होऊ शकतो. संसर्गाची परिणामकारकता लसीमुळं कमी होऊ शकते. लसीमुळे त्या व्यक्तींना आयसीयूची गरज लागणार नाही. ऑक्सिजनची गरज लागणार नाही. अमेरिका आणि इतर देशांमध्ये लसीकरण झालंय त्या ठिकाणी संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असला तरी मृत्यूदर कमी झालेला दिसतो. त्यामुळं नागरिकांनी कोरोना लस घेतली असली तरी सतर्कता बाळगण्याची गरज आहे. लस नाकातून घ्यायची की दंडातून घ्यायची यासंदर्भात आयसीएमआर आम्हाला मार्गदर्शन करत असते, ते सांगतील तसा लसीकरणाचा कार्यक्रम आम्ही राबवू, असं राजेश टोपे म्हणाले.

 

राज्यातील लसीकरण यंत्रणा सक्षम आहे. लस उपलब्ध नसल्यानंतर लसीकरण बंद असतं अशा ठिकाणी केंद्राकडून लस उपलब्ध होत नसल्याचं दिसून येत, असंही राजेश टोपे म्हणाले.

 

Protected Content