यशस्वी उद्योजक होण्यासाठी औत्सुक्य असणे गरजेचे ; प्रा. झुणझुणवाला

 

जळगाव, प्रतिनिधी | यशस्वी उद्योजक होण्यासाठी कामाप्रती समर्पण, औत्सुक्य आणि मनात खळबळ असणे गरजेचे असल्याचे प्रतिपाद पद्मश्री प्रा.अशोक झुणझुणवाला यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील इनोव्हेशन इनक्यूबेशन केंद्र आणि संदीप विद्यापीठातील विज्ञान प्रशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.३० मे पासून सुरू झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील दोन दिवसीय ई- उद्योजकता परिषदेचे उद्घाटन करताना प्रा. झुणझुणवाला बोलत होते.  नवउद्योजक यांनी घ्यावयाची काळजी तसेच इनक्यूबेटर सेंटर यांनी त्यांना उपलब्ध करून देण्याचे संसाधने व स्पर्धात्मक युगातील आव्हाने या विषयावर आयआयटी,चेन्नईचे प्रा.अशोक झुणझुणवाला यांनी संवाद साधला. “मास्टर ऑफ वन, बट जॅक ऑफ ऑल” याची आवश्यकता प्रत्येक नवीन उद्योजकाला असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, आज भारतातील विद्यापीठांमध्ये मोकळेपणा शिल्लक नाही. विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोकळीक देणे गरजेचे आहे. नवउपक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मात्र आपला पैसा अतिशय योग्य पद्धतीने खर्च करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले. मद्रास आयटी पार्क येथे सुद्धा अगदी कमी रक्कम व उपक्रम सुरू करणाऱ्यांना दिली जाते. नंतर आपोआपच विद्यार्थी आपला उद्योग वाढवतात अशी माहिती त्यांनी दिली. जैवतंत्रज्ञान विभाग मुख्य व्यवस्थापक डॉ.अमिताभ मिश्रा यांनी भारत सरकारच्या विविध योजना यांची माहिती दिली. तिसऱ्या सत्रात उद्योजक केंद्र जळगाव उपसंचालक अविनाश दंडगव्हाळ यांनी यशस्वी उद्योजक बनण्यासाठी लागणाऱ्या गुणांची शास्त्रशुद्ध माहिती दिली. प्रा.भूषण चौधरी यांनी प्रास्ताविक तर संदीप विद्यापीठ, नाशिक येथील इनक्यूबेशन सेंटरचे समन्वयक निखील कुलकर्णी यांनी सुत्रसंचालन केले. दरम्यान, उद्या दि. ३१मे रोजी सकाळच्या सत्रात डॉ. मिलिंद चौधरी तसेच पहिल्या पिढीचे नवउद्योजक सर्व श्रोत्यांना त्यांचे अनुभव सांगणार आहेत. तर दुसऱ्या सत्रामध्ये आयआयटी कानपूर येथील डॉ. संदीप पाटील हे नॅनो टेक्नॉलॉजीचा उपयोग याबद्दल नवउद्योजकांना मार्गदर्शन करणार आहे. प्रा. भूषण चौधरी, डॉ.वासुदेव झांबरे, निखिल कुलकर्णी, डॉ. विकास गीते या संवादाचा ऊहापोह करतील.

Protected Content