मुंबई, वृत्तसंस्था ।पहिल्या फेरीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघाला असता तर मोदी सरकारची प्रतिष्ठा वाढली असती, मात्र हे सरकार शेतकऱ्यांबरोबर चर्चेच्या एकापाठोपाठ एक फेऱ्या घेऊन, एक प्रकारे विक्रम प्रस्थापित करत असल्याचा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगविला आहे.
संजय राऊत म्हणाले, शेतकरी आंदोलन हे देशाच्या राजधानीत मागील ६० दिवसांपासून सरू आहे. उद्या ट्रॅक्टर रॅली काढली जाणार आहे, हे पाहून मला असं वाटतं हे अभूतपूर्व आंदोलन उद्या होणार आहे. दिल्लीत लाखो शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व राज्यांमधील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्रभरातील शेतकरी मुंबईत पोहचत आहेत. काळजी घ्यावी लागेल, कारण मुंबई सारख्या शहरातून अजूनही कोरोना गेलेला नाही. नाहीतर पुन्हा नवीन संकट राज्यात निर्माण होईल, ही चिंता मुख्यमंत्र्यांना आहे. तसेच, भविष्यात तुम्हाला शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावाच लागणार आहे. परंतु, ६० दिवस शेतकऱ्यांना अशाप्रकारे ताटकळत ठेवून प्रजासत्ताक दिनी, आंदोलन राजधानी दिल्लीत सुरू ठेवून, तुम्हाला देशातील वातावरण बिघडवून अशांतता निर्माण करण्याचे तुमचं कारस्थान आहे का? अशी शंका आता लोकांना येत आहेत असं देखील संजय राऊत यांनी स्पष्ट केले.