मोठे नेते नसतानाही शेतकऱ्यांची आंदोलनस्थळी गर्दी कायम

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । दिल्लीच्या सीमेवर नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु झालेलं  शेतकरी आंदोलनाला  आता 3 महिने झालेत. आंदोलनात आजही शेतकरी आंदोलकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाचा कालवधीचा विचार करुन शेती आणि आंदोलन सोबत करण्याची घोषणा केलीय. रोटेशनचा अवलंब करण्यात येत आहे

 

शेतकऱ्यांनी निश्चित केलेल्या रोटेशन पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आंदोलनस्थळी येण्यासाठी निश्चित वेळ ठरवून देण्यात येत आहे. बाकी जिल्ह्यांमधील लोक त्या वेळेत आपली शेतीची कामं करतील असं ठरलं आहे. याचाच परिणाम म्हणून सोमवारी गाझीपूर बॉर्डरवर कोणताही मोठा शेतकरी नेता हजर नसतानाही पुरेशी आंदोलक शेतकऱ्यांची संख्या राहिली. असं असलं तरी मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या संख्येत कमी-अधिकपणा होता. मात्र, शेतकरी नेत्यांनी ‘रोटेशन’ नीती बनवल्याने प्रत्येक गावातील शेतकरी आळीपाळीने आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित राहत आहेत.

 

 

रोटेशन नीतीवर बोलताना भारतीय किसान यूनियनचे उत्तर प्रदेश अध्यक्ष राजवीर सिंह जादौन म्हणाले, “राकेश टिकेत बॉर्डरवर उपस्थित असतात तेव्हा त्यांना भेटण्यासाठी अनेक भागांमधून लोक येतात. त्यावेळी आंदोलनस्थळावरील गर्दी वाढते. हे शेतकरी आंदोलन आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अनेक दिवस चालेल. जशा समुद्राच्या लाटा-लहरी तयार होत असतात तसाच आंदोलनाचाही स्वभाव असतो. त्यात कमी-अधिक लोक येत राहतात.”

 

“गाझीपूर बॉर्डरवर शेतीच्या कामांमुळे आंदोलकांची संख्या कधी अधिक असते तर कधी कमी होताना दिसत होती. सध्या पश्चिम उत्तर प्रदेशात उसतोड आणि उस लागवडीचा काळ आहे. इतरही पिकांची लागवड सुरु आहे. प्रत्येक राज्यात अशा प्रकारे कोणत्या ना कोणत्या पिकासाठी शेती कामं सुरु आहेत. त्यामुळेच प्रत्येक गावाने आळीपाळीने आंदोलनस्थळी येण्याचा निर्णय घेण्यात आला,” अशी माहिती आंदोलनाच्या आयोजकांकडून देण्यात आलीय.

Protected Content