मुस्लीम आरक्षणाचा प्रस्ताव नाही-मुख्यमंत्री : महाविकास आघाडीत बिघाडी

मुंबई प्रतिनिधी । नवाब मलिक यांनी मुस्लीम समुदायाला पाच टक्के आरक्षण देण्याची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगितल्याने महाविकास आघाडीतील बिघाडी समोर आली आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त पत्रकार परिषद घेतली. मुस्लिम आरक्षणाबाबत मागील आठवड्यात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विधान परिषदेत भूमिका मांडली होती. राज्य सरकार मुस्लिमांना शिक्षणात ५ टक्के आरक्षण देणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर कायदा करण्यात येईल, असं मलिक यांनी म्हटलं होतं. त्याबाबत विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले, मअद्याप तसा कुठलाही प्रस्ताव आमच्यापुढं नाही. तोपर्यंत विरोधकांनी आदळआपट करण्याची गरज नाही. ही एनर्जी मुद्दा आल्यावर वापरण्यासाठी जपून ठेवा असा सल्लादेखील त्यांनी दिला.

दरम्यान, एनआरसी व एनपीआरचा अभ्यास करण्यासाठी सरकार समिती स्थापन करणार आहे. ही समिती या सगळ्याचा अभ्यास करेल. मात्र, कुठल्याही कायद्यामुळं राज्यातील एकाही नागरिकाचा हक्क हिरावला जाणार नाही याची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Protected Content