मुंबई वेगळी करण्यासाठी भाजपचे प्रेझेंटेशन : राऊतांचा आरोप

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्यासाठी गृहमंत्रालयात भाजपने एक प्रेझेंटेशन केले असून किरीट सोमय्या याचे एक सूत्रधार असल्याचा आरोप आज खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

 

मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप खासदार संजय राऊत कधीपासूनच करत आहेत. याच आरोपाचा पुनरूच्चार करत त्यांनी आज एक नवा गौप्यस्फोट केला आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचं प्रेझेंटेशन भाजपने तयार केले असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. माझा हा गौप्यस्फोट नसून, हे सत्य आहे. मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरु असल्याचे राऊत म्हणाले. या कटाचे सुत्रधार भाजपचे नेते किरीट सोमय्या हे आहेत. त्यांच्यासोबत वारणसीमधील एक व्यक्ती आणि मुंबईतील भाजपशी संबधीत एक मोठा बिल्डर असल्याचे राऊत म्हणाले. यासाठी पैसे गोळा करण्याचे काम सुरु असल्याचा दावा देखील राऊत यांनी केला.

या संदर्भात संजय राऊत पुढे म्हणाले की, किरीट सोमय्या दोन कारणांसाठी दिल्लीत जातात. एक म्हणजे खोटे कागद घेऊन जातात, दुसरे म्हणजे मुंबई केंद्रशासीत प्रदेश करण्यासंदर्भात त्यांचे कारस्थान सुरु आहे. मुंबईतील काही धनिक, बिल्डर यांच्या संगनमताने सोमय्या हे नेतृत्व करत आहेत. मुंबईवर केंद्राचे राज्य आणायचे आहे. हा महाराष्ट्रद्रोह असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले.

Protected Content