माफी मागा नाही तर स्वत:लाच जोडे मारा ! : शिवसेनेचा हल्लाबोल

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांनी माफी मागावी अन्यथा स्वत:लाच जोडे मारावेत असा खोचक सल्ला शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिला आहे.

ठाकरे गटाचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनात आज राज्यपालांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर भाष्य करत त्यांयावर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, ‘भारत जोडो’ यात्रेतील एका पत्रकार परिषदेत श्री. गांधी यांनी सावरकरांच्या दया याचिकेची कागदपत्रे दाखवून वादळ ओढवून घेतले तेव्हा महाराष्ट्रातील भाजप व त्यांच्या सोबतचा मिंधे गट स्वाभिमान, अपमान वगैरेंच्या नावाने वळवळू लागला, त्यातले काही वळू रस्त्यावर उतरले. त्यांनी शिवसेना आता काय करणार? असे विचारून राहुल गांधी यांना जोडे मारण्याचा उपक्रम सुरू केला. आता हे सर्व जोडे स्वतःच्याच हाताने स्वतःच्याच कानाखाली मारण्याची वेळ या जोडेबाजांवर आली आहे.

यात पुढे नमूद केले आहे की, वीर सावरकरांचा अपमान झाला म्हणून संपूर्ण कॉंग्रेसला व गांधी परिवारास गुन्हेगार ठरवणारे शिवरायांचा अपमान हा एखाद्याचे वैयक्तिक मत आहे, असे सांगतात. हा पळपुटेपणा आहे. अशा पळपुट्यांना राज्यपालांच्या धोतरात बांधून अरबी समुद्रात बुडवायला हवे असे महाराष्ट्राच्या ११ कोटी जनतेचे वैयक्तिक मत आहे. शिवरायांचा अपमान करणार्‍यांना महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल!, असा इशारा सामनातून देण्यात आला आहे.

Protected Content