महिना अखेरपर्यत महाराष्ट्र पूर्णतः होणार सुरु : विजय वडेट्टीवार

 

मुंबई , वृत्तसंस्था । कोरोना काळात जाहीर करण्यात आलेले लॉक डाऊन नियमांमध्ये शिथिलता आणून अनलॉक प्रक्रिया राबवली जात आहे. यात बुधवारी गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली चित्रपट आणि नाटय़गृहे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. नोव्हेंबरच्या अखेपर्यंत महाराष्ट्र पूर्णतः सुरू होईल अशी ग्वाही मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी यावेळी मुंबई लोकल सुरु करण्यासंबंधी लवकरच राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि रेल्वेवर निशाणा साधला. “रेल्वे सुरु करण्यासंबंधी खरं तर आमची चार पत्रं होती. त्याला परवानगी न देता काही त्रुटी काढल्या जात आहे. सरकार आणि रेल्वेला क्रेडिट घ्यायचं असेल तर त्यांनी घ्यावं. आम्ही रेल्वे विभागाला तीन पत्रं पाठवली आहेत. त्यावर सुरक्षेसाठी काय करणार, गर्दी टाळण्यासाठी काय करणार आम्हाला विचारत आहेत. आम्ही सगळी यंत्रणा राबवत आहोत. राज्य सरकार याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेईल,” असं त्यांनी सांगितलं.

राज्यातील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत असून या महिनाअखेर राज्यातील स्थिती पूर्वपदावर आणली जाईल. डिसेंबरपासून सर्व जनजीवन पूर्वपदावर येईल, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. धार्मिळस्थळे सुरू करण्याची मागणी करण्यात येत असली तरी सरकारने अद्याप तरी धार्मिक स्थळे सुरू करण्याचा निर्णय घेतलेला नाही. भाजप आणि काही हिंदुत्ववादी संघटनांनी मंदिरांची कुलुपे उघडण्याचा इशारा दिला तरीही सरकारने धार्मिक स्थळांबाबतचा निर्णय घेतलेला नाही. राज्यात धार्मिकस्थळे आणि शाळा-महाविद्यालयांवरच सध्या तरी निर्बंध लागू आहेत.

Protected Content