मनुष्य अंतरंगी चांगला असावा – हभप विशालशास्त्री महाराज

जळगाव, प्रतिनिधी | मनुष्य बाह्यरंगी नव्हे अंतरंगी चांगला असावा लागतो. मनुष्याचा स्वभाव कसाही असला तरी त्याचे मूळ गुण जात नाही. मातापित्यातील गुण मुलांमध्ये उतरतात हे खरे असले तरी, याला अपवाद देखील असतात, असे मार्गदर्शन भागवताचार्य हभप विशालशास्त्री गुरुबा यांनी केले.

 

धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील कार्यात अग्रेसर असलेले तरुण कुढापा मंडळातर्फे संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे महानगरपालिका शाळा क्रमांक ३, पांजरापोळ परिसर या ठिकाणी दि. २५ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे आयोजनाचे पाचवे वर्ष आहे. पहिल्या दिवशी सकाळी पाच जोडप्यांच्या हस्ते ग्रंथ पूजन, तुळशी पूजन, प्रतिमा आणि कलश पूजन करण्यात आले. यावेळी हभप विशाल शास्त्री गुरुबा यांनी मंत्रोच्चारात पूजा करीत महाआरती करून भागवत कथेला प्रारंभ केला.

दुपारी संगीतमय श्रीमद् भागवत कथेला प्रारंभ झाला. भागवताचार्य हभप विशाल शास्त्री गुरुबा यांनी श्रीमद् भागवत कथेचे महत्व विषद करीत कथा वाचनाला प्रारंभ केला. ते म्हणाले की, भक्तीविना प्रत्येक भाविक भुकेला आहे. देवाच्या नामस्मरणाने आपल्याला आत्मनुभूती प्राप्त होते. कथेवेळी, विविध भजनांवर भाविकांनी ताल धरला. कर्म करताना सांभाळून करावे, असे सांगत, “जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर” हे संत वचन सांगितले. संगीतमय श्रीमद भागवत कथेचा दररोज दुपारी १.१५ वाजता भाविकांनी उपस्थिती देऊन लाभ घ्यावा असे आवाहन तरुण कुढापा मंडळातर्फे अध्यक्ष पंकज भावसार, उपाध्यक्ष सुमित सपकाळे, कार्याध्यक्ष शंभू भावसार यांनी केले आहे.

Protected Content