नाशिक, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यात यावेत, अशी मागणी मुंबई आणि ठाणे येथील सभांमधून केली होती, परंतु राज्य सरकारने या प्रकाराला विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेकडून सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देत केंद्र सरकारला साकडे घातले आहे.
गुढी पाडवा मेळावा आणि ठाण्यातील सभेद्वारे राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यात यावेत, अशी मागणी करीत राज्य सरकारला हे भोंगे हटवण्यासाठी ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. परंतु राज्य सरकारने या प्रकाराला विरोध केला असून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी, राज ठाकरेंनी केलेल्या मागणीस धार्मिक रंग देत विविध पक्षातील नेत्यांकडून चिथावणीखोर वक्तव्य केली जात आहेत.
२००५ च्या जनहित याचिका निकालाचा दिला दाखला
राज्यातील गृहमंत्री या संवैधानिक पदावर असलेल्या दिलीप वळसे पाटील यांनी कुठल्याही परिस्थितीत मशिदींवरील भोंगे उतरवण्यात येणार नसल्याचे सांगत पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे वक्तव्य करीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं उल्लंघन करणारी भूमिका घेतली आहे. मशिदींवरील भोंग्यांच्या घोषणांमुळे सार्वजनिक शांततेत भंग होत आहे. या ध्वनी प्रदूषणामुळे जगण्याच्या अधिकारात व्यत्यय येत असून मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने १८ जुलै २००५ च्या जनहित याचिकेच्या निकालाचा हवाला देत आता हे भोंगे हटवण्याची मागणी मनसेच्या नाशिक विभागाकडून गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.