भारतातील शेतकरी आंदोलनाचे अमेरिकेतही पडसाद

वॉशिंग्टन: वृत्तसंस्था । केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे जागतिक पातळीवरही पडसाद उमटत आहे. अमेरिकेत या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात भारतीय वंशाच्या नागरिकांनी मोर्चे काढले.

यामध्ये शीख समुदायाचा मोठा सहभाग होता. सॅन फ्रान्सिको येथील भारतीय वाणिज्य दूतावासावर काढण्यात आलेल्या मोर्चामुळे ‘बे ब्रिज’वरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

कॅलिफोर्नियातील विविध भागात भारतीय शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी आंदोलन झाले. त्याशिवाय इंडियानापोलिसमध्ये ही आंदोलन करण्यात आले. शेतकरी देशाचा आत्मा आहे. आपल्याला आत्म्याचे रक्षण करण्याची आवश्यकता असल्याचे आंदोलक गुरिंदर सिंग खालसा यांनी म्हटले.

अमेरिका, कॅनडासह जगातील इतर देशातही भारतातील कृषी कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आले आहे. भारतातील या कायद्यामुळे शेती आता खासगी क्षेत्रासाठी उघडण्यात येणार आहे. मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांना याचा फायदा होणार आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचा दावा यावेळी आंदोलकांच्यावतीने करण्यात आला.

या आंदोलनच्या एक दिवसआधी शिकागोमध्ये शीख-अमेरिकन समुदायाच्या लोकांनी एकत्र येऊन भारतीय दूतावासासमोर मोर्चा काढला. यावेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवणारी पोस्टर, बॅनर निदर्शकांनी झळकावले. भारत सरकारने तीन कृषी कायदे मागे घ्यावे असा आमचा आग्रह नसून मागणी असल्याचे शीख समुदायाचे नेते दर्शन सिंग दरार यांनी सांगितले.

ब्रिटन आणि कॅनडातील खासदारांनी भारतातील आंदोलक शेतकऱ्यांवर झालेल्या कारवाईचा निषेध केला आहे. शांतेत आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार असून भारतात शेतकऱ्यांच्या आंदोलनावर होत असलेली दडपशाही चुकीचे असल्याचे खासदारांनी म्हटले. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनीदेखील भारतातील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. भारताने ट्रुडो यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत दोन्ही देशांतील संबंध खराब होतील, असा इशाराही दिला.

Protected Content