वेलिंग्टन (वृत्तसंस्था) न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात भारतानं ३५ धावांनी विजय मिळवून मालिकेचा शेवट गोड केला. रायुडू, विजय शंकर आणि हार्दिक पंड्याच्या जिगरबाज खेळीमुळं भारतानं न्यूझीलंडसमोर २५२ धावांचं आव्हान उभं केले. हे आव्हान पार करताना न्यूझीलंडचा संघ २१७ धावांवर गारद झाला. या विजयासह भारतानं ही एकदिवसीय मालिका ४-१ अशा फरकाने जिंकली आहे.
भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. पण त्यांची 4 बाद 18 अशी दयनीय अवस्था झाली होती. पण त्यानंतर रायुडूने 8 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 90 धावांची दमदार खेळी साकारली. त्याचबरोबर हार्दिक पंड्या आणि विजय शंकर यांनी प्रत्येक 45 धावांची खेळी साकारल्यामुळे भारताला 252 धावा करता आल्या.भारताच्या गोलंदाजांनाही यावेळी भेदक मारा केला. फिरकीपटू युजवेंद्र चहलने तीन विकेट्स मिळवल्या. मोहम्मद शमी आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. भारताप्रमाणे न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. मोहम्मद शमीने दोन्ही सलामीवीरांना ठराविक अंतराने माघारी धाडले. यानंतर केन विल्यमसन आणि टॉम लॅथम यांच्यात रंगलेल्या अर्धशतकी भागीदारीमुळे सामना काहीकाळ अटीतटीचा होईल असे वाटतं होते. मात्र लॅथम माघारी परतल्यानंतर एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत राहिले. जिमी निशमने झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचे प्रयत्न तोकडे पडले. भारताकडून युजवेंद्र चहलने 3, मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी 2-2 तर भुवनेश्वर कुमार आणि केदार जाधवने प्रत्येकी 1 बळी घेतला. या सामन्यात भारताने ३५ धावांनी विजय मिळवून मालिकेचा शेवट गोड केला. मालिका ४-१ ने खिशात घातली. ९० धावांची खेळी करणारा रायुडू सामनावीर ठरला.