मुंबई प्रतिनिधी । शरद पवार यांनी कितीही उसने अवसान आणले तरी भाजपनेच व्हिआयपी संस्कृती मोडीत काढल्याचा टोला पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी मारला आहे.
शरद पवार यांनी नुकतेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहले आहे. यात राज्यातील व्हीआयपी संस्कृती मोडीत काढा, नेत्यांचे कार्यक्रम, जाहीर सभांच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी पोलिसांवर ताण येतो, वरिष्ठ पोलिस अधिकारी त्यामध्ये गुंतून राहतात, त्यामुळे हे थांबले पाहिजे, पोलिसांवरील ताण कमी झाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. यावर भाजपचे प्रवक्ते भांडारी म्हणाले, राज्यात भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर पोलिसांनी सलाम करण्याची पद्धत राज्याचे तत्कालिन सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि विद्यमान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बंद करायला लावली. तशा सूचना त्यांनी सर्वांना दिल्या होत्या. त्याचप्रमाणे तत्कालिन मुख्यमंत्री आणि राज्याचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही व्हीआयपी संस्कृती मोडित काढण्याचा निर्णय घेतला व तो अंमलातही आणला. लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील लाल दिव्याची संस्कृती बंद केली होती. त्यामुळे पवार यांनी उसने अवसान आणू नये असा टोलादेखील भांडारी यांनी मारला आहे.