…तर भाजपच्या खासदारांना कांदे फेकून मारणार

 

 

अहमदनगर: वृत्तसंस्था । ३१ डिसेंबर पर्यंत कांदा निर्यातबंदी न हटविल्यास १ जानेवारी पासून कांदा उत्पादक शेतकरी, दिसतील तेथे भाजपाच्या खासदारांना कांदा मारण्याचे आंदोलन करतील, असा इशाराच शेतकरी संघटनेने दिला आहे.

शेतकरी संघटनेचे प्रणेते दिवंगत शरद जोशी यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त शेतकरी संघटनेची श्रीगोंदा येथे नगर व पुणे जिल्ह्याची संयुक्त बैठक झाली. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी न उठविल्यास कांदा उत्पादक शेतकरी भाजपाच्या खासदारांना कांदे मारण्याचे आंदोलन करतील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली.

कांद्याचे ठोक विक्री दर ६० रुपये किलोच्या पुढे गेल्या नंतर केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंद केली. साठ्यांवर मर्यादा घातली. व्यापांर्‍यावर छापे टाकून कांद्याचे दर पाडले आहेत. अनेक शेतकर्‍यांकडे अद्यापही साठवलेला कांदा आहे. डिसेंबर अखेर व जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला नवीन कांदा बाजारात यायला सुरुवात होते. हा कांदा बाजारात आल्यानंतर आणखी दर कोसळण्याची शक्यता आहे.

कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या हिताचा विचार करून केंद्र सरकारने तातडीने कांदा निर्यात बंदी कायमची उठविण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने यावेळी करण्यात आली. ३१ डिसेंबर पर्यंत कांदा निर्यातबंदी न हटविल्यास १ जानेवारी पासून कांदा उत्पादक शेतकरी, दिसतील तेथे भाजपाच्या खासदारांना कांदा मारण्याचे आंदोलन करतील असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

कांद्याच्या प्रश्नाबरोबरच दिवसा वीज पुरवठा, ऊस दर, दूध दर, वन्य प्राण्यांचा त्रास, साखर कारखान्यातील काटामारी, साखर उतारा चोरी, बाजार समित्यांमधील लूट आदी विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा सीमा नरोडे आदी उपस्थित होते शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनील घनवट यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

Protected Content