भाजपच्या ‘आफत’ चक्रीवादळाचा राजभवनाला फटका- देवेंद्र मराठेंची खोचक टिका

जळगाव प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाचे ‘आफत’ म्हणजे आशीष शेलार, फडणवीस आणि तावडे हे नेते महाविकास आघाडी सरकारच्या कामांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असून त्यांचा फटका राजभवनाला बसल्याची खोचक टिका एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

सध्या परिक्षांवरून महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपालांमध्ये संघर्ष सुरू आहे. या अनुषंगाने एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे एका निवेदनाच्या माध्यमातून राज्यपाल आणि भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपूर्वी महा विकास आघाडी सरकारतर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थी हिताचा निर्णय घेत अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्दचा निर्णय घेतला. परंतु भाजप पक्षाच्या नेत्यांच्या खोट्या गोष्टीमध्ये येत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या निर्णयाला विरोध करत एक पत्र मुख्यमंत्री महोदयांना लिहिले आहे. नेहमीच भाजप पक्षाला झुकते माप देण्याची भूमिका राज्यपाल महोदयांची राहिलेली असल्यामुळे आज जळगाव जिल्हा एनएसयुआय यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी भारत देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना तात्काळ पदावरून हटवण्याची मागणी केली व महाराष्ट्र राज्याला एक पारदर्शक व्यक्ती राज्यपाल म्हणून द्यावा याप्रकारची विनंती केली आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, नेहमीच महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्यासाठी व सरकारच्या हिताच्या निर्णयाविरुद्ध जात महाविकास आघाडी सरकारचे नेहमीच गर्‍हाणे सांगत राजभवन वरती जाणार्‍या भाजप पक्षाच्या आफत चक्रीवादळाचा आता राज्यपाल व राज्य भावना देखील फटका बसलेला आहे. आफत या शब्दाचा अर्थ आ = आशीष शेलार, फ = देवेंद्र फडणवीस, त= विनोद तावडे म्हणजेच संकट असा होतो.
हे भाजप पक्षाचं आफत चक्रीवादळ नेहमीच महा विकास आघाडी सरकारच्या कार्यामध्ये आडकाठी बनण्यासाठी राज्यपाल महोदयांकडे सरकारचे गर्‍हाणे मांडत असतात.

त्याच पद्धतीने आतासुद्धा राजकारण करण्यासाठी भाजप पक्षाच्या वतीने आता राज्यातील विद्यार्थ्यांचे आरोग्य वेठीस धरले आहे. विद्यार्थ्यांच्या जिवाला कुठल्याही प्रकारची कोरोणाची बाधा झाली नाही पाहिजे या उद्देशाने मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला परंतु भाजप पक्ष जणू काही विद्यार्थ्यांच्या जीवावरती उठलेला दिसून येतो आहे. तसेच या विद्यार्थी हिताच्या निर्णयाला विरोध करत राज्यपाल महोदयांना हाताशी घेत विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्या या प्रकारची मागणी केलेली आहे. तर, संघ विचाराच्या लोकांनी तयार केलेल्या महाराष्ट्र विद्यापीठ कायदा २०१६ याचा दाखला देत राज्यपाल महोदयांनी मुख्यमंत्र्यांना परीक्षेसंदर्भामध्ये या कायद्याच्या तरतुदी अंतर्गत भविष्यामध्ये निर्णय घेण्यात येईल अशा प्रकारचे पत्र लिहिले आहे. जर राज्यपाल परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम असतील तर जळगाव जिल्हा यांच्या वतीने आमची मागणी आहे की परीक्षेच्या काळामध्ये राज्यपाल महोदयांनी स्वतः विद्यार्थ्यांसमवेत परीक्षा केंद्रावर ती तीन तास वेळ घालवावा आणि जर राज्यपाल महोदयांना कोरोणाची बाधा नाही झाली तरच माझा विद्यार्थी मित्र हा सुरक्षित आहे याची खात्री होईल.तसेच परीक्षा कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयातून नेण्याची व आणण्याची जबाबदारी तसेच विद्यार्थ्यांना पीपीपी किट व मास्क ची उपलब्धता करून देणे व आणि विद्यार्थ्यांची महाविद्यालय शहरांमध्ये राहण्याची व जेवणाची व्यवस्था करून देणे आवश्यक आहे. राज्यपाल व राजभवन यांनी ही जबाबदारी घ्यावी असे या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, नेहमीच भाजप पक्षाला झुकते माप देण्याची भूमिका राज्यपाल कोशियारी यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये केलेली दिसून आलेली आहे
भाजप पक्षाच्यावतीने नेहमीच महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्यासाठी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला विरोध करण्यासाठी राज्यपालांनी मध्यस्थीची भूमिका व भाजप पक्षाच्या प्रवक्ते पदाची भूमिका निभावलेली दिसून आलेली आहे. त्यामुळे घटनात्मक प्रमुख असलेले राज्यपाल यांनी स्वतःची कार्यपद्धती विसरत घटनाबाह्य जाऊन भाजप पक्षाला मदत केलेली आहे त्यामुळे अशा भाजप पक्षाच्या राज्यपालांना तात्काळ पदावरून हटवण्याची मागणी राष्ट्रपती महामहीम रामनाथ कोविंद यांच्याकडे ई-मेल व ट्विटर द्वारे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केली असून महाराष्ट्र राज्याला पारदर्शक व निपक्ष भूमिका निभावणारा व्यक्ती राज्यपाल म्हणून द्यावा अशी विनंती केली असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

Protected Content