जळगाव प्रतिनिधी । लग्न लागून घरी जाणाऱ्या वऱ्हाडींच्या ट्रकच्या टपाला झाडाची फांदीचा फटका बसल्याने टपावर बसलेल्या चार तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली असून चौघांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, चहार्डी ता. चोपडा येथील लग्नाचे वऱ्हाड आज जळगाव तालुक्यातील दापोरा येथे लग्नासाठी आले होते. दरम्यान दुपारी लग्न झाल्यानंतर ३ वाजेच्या सुमारास घरी चहार्डी येथे जाण्यासाठी ट्रकने निघाले होते. यावेळी ट्रकच्या टपावर सहा ते सात तरूणही बसले होते. शिरसोली आणि दापोरा दरम्यानच्या गावाजवळ ट्रक भरधाव वेगाने जात असतांना ट्रकच्या टपावर बसलेल्या तरूणांना झाडाच्या फांदीचा जोराचा फटका बसला. यात श्रीराम अभिमन कोळी (वय-३५), दिपक दत्तात्रय कोळी (वय-२२), जितेंद्र बापू कोळी (वय-२१) आणि दशरथ कोळी (वय-२२) सर्व रा. चहार्डी ता. चोपडा हे गंभीररित्या जखमी झाले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयातील रूग्णवाहिका घेण्यासाठी रवाना झाली मात्र रूग्णवाहिका रस्त्यावर बिघाड होऊन बंद पडली. जखमी रूग्णांना खासगी वाहनाने जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.