‘बॅण्ड पार्टी’च्या कलाकारांना उदरनिर्वाहाबद्दल चिंता

चाळीसगाव प्रतिनिधी । सध्या लॉकडाऊनचा फटका अनेकांना बसला आहे. यातच लग्न सराईला परवानगी नसल्यामुळे बॅण्ड पार्टीच्या कलाकारांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ते चिंताग्रस्त झालेले दिसून येत आहे. चाळीसगावातील अनेक बॅण्ड पथकाच्या कलावरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

चाळीसगावातील ब्रास बँड जवळपास महाराष्ट्रभर आपल्या सुमधूर संगीतासाठी प्रसिद्ध असून महाराष्ट्रातील विविध भागातून चाळीसगावच्या या बँड पथकांना लग्न समारंभ, जयंती, वाढदिवस, गणेशोत्सव, नवरात्र, उत्सव यासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी असते. शहरात जवळपास सात पथके निर्माण झाले असून या सात पथकातून जवळपास 300 वाद्य कलाकार आपला उदरनिर्वाह वर्षभर या उद्योगाच्या माध्यमातून भागवित असतात. मात्र यंदा जगभर थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसमुळे देशभरातील सार्वजनिक कार्यक्रम लग्नसमारंभ उत्सव हे लॉकडाऊन असल्यामुळे रद्द झाल्याने या बॅण्ड पथकांवर पूर्णपणे उपासमारीची वेळ आली आहे. लग्नसमारंभाचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच घेतलेल्या सुपार्‍या पूर्ण रद्द झाल्यात आणि जवळ असलेल्या कर्मचाऱ्यांना बॅण्‍डपथक मालकांनी दिलेला ॲडव्हान्स देखील परत मिळवता आला नाही तर येणारी कमाई पूर्णपणे बंद होऊन घरी बसून उदरनिर्वाह करावा लागत असल्याने या बॅण्ड कलाकारांवर अनेक अडचणींना सामोरे जात हलाखीची परिस्थिती येऊन ठेपली आहे. लोकांच्या आनंदात आपला सहभाग नोंदवून तो आनंद द्विगुणित करणाऱ्या या कलाकारांकडे मात्र समाजातील घटकांचे तथा शासनाचे लक्ष नसल्याने त्यांच्या व्यथा ऐकून घेण्यासाठी कोणी नसल्याची खंत बँड कलाकार व त्यांचे मालक आज व्यक्त करीत आहेत.

Protected Content