प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत सहभागी शेतकऱ्यांनी किसान क्रेडीट कार्ड काढावे : जिल्हाधिकारी

avinash dhakne

 

जळगाव (प्रतिनिधी) शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत जळगाव जिल्ह्यात 4 लाख 78 हजार 109 शेतकरी लाभार्थी आहेत. जे लाभार्थी शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत सहभागी आहेत, परंतु त्यांना अजूनही किसान क्रेडीट कार्ड (KCC) मिळाले नाहीत. अशा पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध व्हावे, याकरीता विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत. त्याचबरोबर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत ज्या पात्र लाभार्थी शेतक-यांनी अद्याप कोणत्याही वित्तीय संस्था व बँकाकडून पीक कर्ज घेतलेले नाही. अशा शेतक-यांनी या विशेष मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहनही डॉ. ढाकणे यांनी केले आहे.

 

देशातील शेतक-यांना बँकिंग क्षेत्राकडून पीककर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जिल्हा अग्रणी बँक अधिकारी अरुण प्रकाश, नाबार्डचे व्यवस्थापक श्रीकांत झांबरे, सहकार उपनिबंधक मेघराज राठोड व या यंत्रणेतील सर्व संबधित अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करून संबंधितांना विशेष मोहिम राबविण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व बँक शाखाधिकारी यांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करुन शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण जाणवणार नाही, याची दक्षता घेण्याचेही निर्देशही दिले आहेत.

शासनाच्या योजनांचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ घेता यावा यासाठी आयबीए संस्थेकडून एक पानी अर्जाचा नमुना सर्व बॅकांना उपलब्ध्‍ा करुन देण्यात आलेला आहे. लाभर्थी शेतक-यांनी या अर्जासोबत शेतीचे उतारे व कर्ज नसलेबाबतचे घोषणापत्र घेऊन ज्या बॅकेतून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेतलेला आहे, त्या बॅकेंत संपर्क साधावा. कोणत्याही बँक अथवा वित्तीय संस्था येथून पीक कर्ज न घेतलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना कर्ज प्रोसेसिंग चार्जेस व निरीक्षण खर्च बँकांकडून माफ करण्यात येणार आहे. परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह प्राप्त झाल्यापासून 15 दिवसामध्ये शेतक-यांना बँकांमार्फत किसान क्रेडीट कार्ड (केसीसी) योजनेतंर्गत पीक कर्ज उपलबध करुन देण्यात येणार आहे.  सर्व तलाठी, बँक सखी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांनी गाव पावतळीवर यासाठी विशेष मोहिम राबवून आपल्या कार्यक्षेत्रातील बँकांना सर्वतोपरी सहकार्य करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिल्या आहेत.

Protected Content