पॅन्गाँग सरोवरावरील फिंगर ४ पासून मागे हटण्यास चीनचा नकार

बीजिंग: : वृत्तसंस्था । चीन . लडाखमधील पॅन्गाँग सरोवरावरील फिंगर ४ पासून मागे हटणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, चीन सरकारचे वृत्तपत्र असणाऱ्या ‘ग्लोबल टाइम्स’ने हे वृत्त फेटाळून लावले असून चिनी सैन्य माघार घेणार नसल्याचे म्हटले आहे.

भारतीय माध्यमांनी चुकीचे वृत्त दिले असल्याचेही ‘ग्लोबल टाइम्स’ने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. लडाखमधील तणाव निवळण्याच्या दृष्टीने भारत आणि चीन दरम्यान चर्चा सुरू आहे. दोन्ही देशांनी तणाव निवळण्यासाठी सहमतीने निर्णय घेतला आहे. चीन आपल्या सैनिकांना फिंगर आठपासून पूर्व दिशेला मागे घेईल. तर, भारतीय सैनिक पश्चिमेच्या दिशेने फिंगर-२ आणि फिंगर-३ च्या दरम्यान धन सिंह थापाच्या पोस्टच्या दिशेने मागे जाईल. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार आहे.

फिंगर ३ ते फिंगर आठ हा भाग पूर्णपणे बफर झोन असणार या भागात कोणीही गस्त घालणार नाही. सर्व संघर्षाच्या ठिकाणांपासून दोन्ही देश आपापले सैन्य आणि शस्त्रे तीन टप्प्यांत पूर्वस्थितीला (एप्रिल-मे महिन्यांतील) घेणार आहेत. दोन्ही देशांमध्ये लष्करी पातळीवर झालेल्या चर्चेच्या आठव्या फेरीमध्ये यावर सविस्तर चर्चा झाली असून, चर्चेच्या पुढील फेरीमध्ये यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल, अशी माहिती भारतीय माध्यमांना सूत्रांनी दिली.

‘ग्लोबल टाइम्स’ने सैन्य माघारीचे वृत्त फेटाळून लावले आहे. आठव्या फेरीतील चर्चा चांगली झाली असून भारतीय माध्यमांनी सैन्य माघारीचे दिलेले वृत्त चुकीचे असल्याचे ‘ग्लोबल टाइम्स’ने म्हटले आहे. भारतीय माध्यमे देशातील राष्ट्रवादाचे समाधान करण्यासाठी अशा प्रकारचे वृत्त देत असल्याचा आरोप ‘ग्लोबल टाइम्स’ने केला आहे.

भारत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत एकतर्फी पद्धतीने फिंगर चार ते आठ हा त्यांचा गस्त घालण्याचा भाग असल्याचे मानते, असेही ‘ग्लोबल टाइम्स’ने म्हटले. ‘ग्लोबल टाइम्स’च्या या दाव्यामुळे चीनच्या मनसुब्यांबाबबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

करार झाल्यानंतर पहिल्या तीन दिवसांत दोन्ही देश ‘एलएसी’वरील संघर्षाच्या ठिकाणांपासून रणगाडे, तोफा, चिलखती वाहने मागे घेतील.

चीनचे सैन्य उत्तर ‘पँगाँग’ क्षेत्रातील सध्याच्या ‘फिंगर ४’पासून फिंगर ८ क्षेत्रात जाईल. तर, भारताचे सैन्य धनसिंग थापा या चौकीवर येईल. तीन दिवसांत दोन्ही देशांचे दररोज प्रत्येकी ३० टक्के सैन्य मागे

पँगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील, रेझांग ला, मुखपारी आणि मगर हिल या परिसरातून सैन्यमाघारीची प्रक्रिया पूर्ण. चीनच्या आगळिकीनंतर २९ आणि ३० ऑगस्टच्या रात्री भारताने या ठिकाणी असलेली महत्त्वाची शिखरे ताब्यात घेतली होती.

Protected Content