पारोळा येथील ग्रामरोजगार सेवकांच्या तेरा वर्षापासून मागण्या प्रलंबित

IMG 20200201 WA0017

पारोळा प्रतिनिधी | महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत शासकीय काम करणारा ग्रामरोजगार सेवक हा शासन आणि ग्रामीण भागातील पात्र जॉब कार्डधारक मजुर यांच्यातील महत्वाचा घटक असुन दुवा आहे. मात्र गेल्या बारा ते तेरा वर्षापासुन ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्या प्रलंबित आहेत.

फक्त आश्वासानेच पदरात पडलेली आहेत मागण्यांवर कोणतीही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. वास्तविकता पाहता महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना हि महाराष्ट्र राज्याची जननी आहे. तरी त्या राज्यातील ग्रामरोजगार सेवक त्यांच्या मागण्यांपासुन वंचित का आहेत, याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. इतर राज्यात जसे मध्यप्रदेश, कर्नाटक , तेलंगणा आदी राज्यात ग्रामरोजगार सेवकांना दरमहा फिक्स मानधन दिले जाते. तरी आपल्या राज्यात त्याबाबतीत कोणतीही अंमलबजावणी मागील सरकारने केलेली नाही. याउलट हेतुपुरस्कर टाळाटाळ करून दुर्लक्ष केलेले होते. तरी आताच्या महाविकास आघाडी सरकारने ग्रामरोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्या सोडवाव्यात अशी अपेक्षा राज्यातील ग्रामरोजगार सेवकांची असून जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे यांचे काँग्रेसच्या माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना निवेदन देण्यात आले आहे.

त्यानुसार संघटनेच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :- 1) इतर राज्यांप्रमाणे दरमहा फिक्स मानधन देण्यात यावे. 2) ग्रामरोजगार सेवकांचे मानधन त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर टाकण्यात यावे. 3) 2 मे 2011 च्या शासन निर्णयात दुरुस्ती करून पूर्णवेळ करण्यात यावे. 4) शेतकरी हिताची शेती कामे पेरणी ते काढणी पर्यंतची सर्व कामे मनरेगा योजनेत घेण्यात यावी. 5) मनरेगा विभाग राज्यात स्वतंत्र करण्यात यावा.

याबाबत महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटना जळगांव जिल्हा यांच्याकडून काँग्रेसच्या जळगांव जिल्हा प्रभारी तथा माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव ह्या पारोळा तालुक्यात महात्मा गांधी पुण्यतिथी पुजनाच्या निमित्ताने थांबले असता त्यांना हे निवेदन देण्यात आले.

यावेळी माजी मंत्री यांनी सांगितले की, मनरेगा कायदा आमच्याच सरकारने तयार केल्यामुळे ग्रामरोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्यावर रोहयो मंत्री यांना प्रत्यक्ष भेटुन आणि माझ्या लेटरपॅड वर शिफारस करून मागण्या मंजुर करण्यासाठी महत्वाची भुमिका राहील आणि तुमच्या मागण्या मान्यच करायला लावेल. यानुसार ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या मागण्या मांडल्या जातील असे संघटनेला त्यांनी आश्वासन दिले आणि त्याबाबतीत संघटनेने सुद्धा पाठपुरावा करत राहावा, असे हि त्यांनी सांगितले.

सदर निवेदन देतांना संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे आणि इतर तालुक्यातील सर्व ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते.

Protected Content