पाणी शुद्धीकरण यंत्रणा  होणार ‘ऑटोमॅटिक’

 

जळगाव, प्रतिनिधी । शहराला पाणीपुरवठा करणारी सर्व यंत्रणा अद्यावयात होणार असून मार्च २०२१ नंतर शहराला ऑटोमॅटिक पद्धतीने पाणी पुरवठा होणार आहे. पाणीपुरवठा यंत्रणेत होणारे बदल आणि नवीन तंत्रज्ञानाबद्दल मक्तेदाराकडून महापौर सौ. भारती सोनवणे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती घेतली. यावेळी मक्तेदाराच्या प्रतिनिधीने मालेगाव येथील यंत्रणेचे जळगावात बसून प्रात्यक्षिक दाखविले.

मनपाच्या १३ व्या मजल्यावर असलेल्या सभागृहात झालेल्या बैठकीत श्री भैरव इलेक्ट्रोमेक वर्क्स, इस्ट्रो कंट्रोलच्या प्रतिनिधींनी सादरीकरण आणि प्रात्यक्षिकद्वारे पाणीपुरवठा यंत्रणेच्या अत्याधुनिकरणाची माहिती दिली. बैठकीला स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे, नगरसेवक कैलास सोनवणे, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी आणि सर्व मनपा अधिकारी उपस्थित होते.

जळगाव शहराला वाघूर धरणातून पाणीपुरवठा होतो. शहराला स्वच्छ पाणी देण्यासाठी पाण्यावर विविध प्रक्रिया करावी लागते, टाकीत पाण्याची साठवण करावी लागते. पम्पिंग हाऊसपासून पाणी घेणे, जल शुद्धीकरण प्रकल्पापर्यंत पोहचविणे, प्रत्येक गोष्टीची वेळोवेळी नोंद ठेवणे ही प्रक्रिया सध्या फार खर्चिक आणि वेळखाऊ आहे. जळगाव शहरात अमृत योजनेंतर्गत नवीन पाईपलाईन टाकताना मनपा प्रशासनाकडून पाणीपुरवठा यंत्रणा इलेक्ट्रिकल आणि स्काडा सिस्टीम (supervisory control and data acivisory system) द्वारे अद्यावयात करण्याचे निश्चित करण्यात आले होते. सोमवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी नवीन यंत्रणेची माहिती आणि आढावा घेतला.

नवीन यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर पाण्याची आवश्यकता असेल तेव्हा पंप पुन्हा सुरू होईल. कॉम्प्युटर सिस्टीमद्वारे सर्व यंत्रणेवर नियंत्रण ठेवता येईल, पाण्याचा वेग किती हे कळू शकेल, पाण्याचे रासायनिक परीक्षण ऑटोमॅटिक होईल. मनुष्यबळ कमी लागणार, पंपाची क्षमता, वेग कळणार असल्याने पुढील दुरुस्ती किंवा पंपबदल केव्हा करायचे हे अगोदरच कळणार आहे. प्रत्येक दिवसाची सर्व माहिती तात्काळ कळणार आहे.

यंत्रणेत दोष निर्माण झाल्यास वाजणार अलार्म
पाणीपुरवठा यंत्रणेत कुठेही दोष निर्माण झाल्यास लागलीच अलार्म वाजणार आहे. तसेच कोणत्या ठिकाणी काय दोष निर्माण झाला हे कळून त्याठिकाणी असलेल्या ऑपरेटरची माहिती कळणार असल्याने त्याला सूचना देणे शक्य होईल.

जळगाव बसून हाताळली मालेगावची यंत्रणा
मालेगाव येथील अमृत योजनेच्या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. सोमवारी सभागृहात बसून मक्तेदार प्रतिनिधीने संपूर्ण प्रक्रियेचे प्रात्यक्षिक जळगावात बसून करून दाखविले. जळगावातील यंत्रणा देखील त्याच प्रकारे हाताळता येणार असून धरणावर किंवा जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या ठिकाणी न जाता देखील मनपातून नियोजन करणे शक्य होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

पाण्याची गळती सहज समजणार
नवीन यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर धरणापासून पाण्याच्या टाकीपर्यंत येणाऱ्या पाईपलाईनची गळती कळणार आहे. लवकर गळती समजल्याने त्याठिकाणी तात्काळ दुरुस्ती करणे देखील शक्य होणार आहे. तसेच प्रत्येक टाकीवरील व्हॉल्व्हचे ऑटोमेशन केले जाणार असून ठिकठिकाणी सेन्सर बसविले जाणार आहे.

नवीन यंत्रणेची प्रमुख वैशिष्ट्ये :-

● विद्युत खर्च, मनुष्यबळ, वाचेल.

● पाण्याची गळती रोखली जाईल.

● भविष्यातील दुरुस्तीचे नियोजन करता येईल.

● रोज अद्यावयात अहवाल मिळेल, त्यामुळे पारदर्शीपणा वाढेल.

Protected Content