पाकिस्तानच्या उच्चायोग अधिकाऱ्यांना समन्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । जम्मू काश्मीरमधील नगरोटा भागात चार दहशतवाद्यांच्या एन्काउन्टरनंतर भारतानं पाकिस्तानविरोधात कडक धोरण स्वीकारलंय. परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानच्या उच्चायोग अधिकाऱ्यांना समन्स धाडलेत.

नगरोटामध्ये एन्काउन्टरमध्ये ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून अनेक ‘मेड इन पाकिस्तान’ वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत. ठार झालेले चारही जण दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदशी निगडीत होते.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका उच्चस्तरीय बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी, त्यांनी सुरक्षा दलाच्या समयसूचकतेचं कौतुकही केलं.

‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या चार दहशतवाद्यांना सुरक्षा दलांबरोबर तीन तास झालेल्या चकमकीत ठार करण्यात आलं होतं. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या या थरारक घटनेमध्ये दोन पोलीसही जखमी झाले. चारही दहशतवादी नव्यानंच दहशतवादी संघटनेत सहभागी झाले होते. ट्रकमधून प्रवास करत असताना सुरक्षा दलांनी त्यांना हटकलं. त्यानंतर दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक उडाली.

मोठ्या दहशतवादी हल्ल्याची त्यांची योजना होती, असं जम्मूमधील पोलीस महानिरीक्षक मुकेशसिंह यांनी माहिती देताना म्हटलं. ‘जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच जिल्हा विकास मंडळाच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणण्याच्या उद्देशानं चार दहशतवादी काश्मीर खोऱ्याकडे ट्रकमधून निघाले होते.

नागरोटा येथील बन टोलनाक्यावर पहाटे ५ वाजल्याच्या सुमारास ट्रकला अडवण्यात आले. तपासणी करीत असताना ट्रक चालक पळून गेला. हे पाहून अधिक कसून तपासणी करण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दल आणि पोलीस पुढे सरसावले. त्यावेळी ट्रकमधील दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. बेछूट गोळीबारास सुरुवात झाली. जवानांनी दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. जवळपास तीन तास ही चकमक सुरू होती. यामध्ये चारही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, तर दोन पोलीस जखमी झाले. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे’, अशी माहिती मुकेशसिंह यांनी दिली होती.

Protected Content