पाकव्याप्त काश्मीरमध्ये १५ नोव्हेंबरला निवडणुकीची पाकची घोषणा

इस्लामाबाद वृत्तसंस्था । पाकव्याप्त काश्मीर गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये १५ नोव्हेंबर रोजी निवडणूक घेण्याची घोषणा पाकिस्तान सरकारने केली आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी बुधवारी गिलगिट आणि बाल्टिस्तानमध्ये विधानसभा निवडणूक घेण्याच्या विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. याआधी पाकिस्तानने १७ सप्टेंबर रोजी पाकिस्तान सरकारने गिलगिट-बाल्टिस्तानला राज्याचा दर्जा दिला.

पाकिस्तान सरकारने हा निर्णय पाकिस्तान लष्करप्रमुखांच्या सूचनेवरून घेतला असल्याची चर्चा आहे. गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये इम्रान खान यांचा पीटीआय, नवाझ शरीफ यांचा पीएमएलएन आणि बिलावल भुट्टो यांचा पक्ष पाकिस्तानी पीपल्स पार्टी सहभाग घेणार आहे. गिलगिट-बाल्टिस्तान विधानसभेत ३३ जागा असणार आहेत. यामधील २४ जागांवर निवडणूक होणार आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील या निवडणुकीत सात लाख लोक मतदान करणार आहेत. यामध्ये ४५ टक्के महिला आहेत.

भारताने जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष राज्याचा दर्जा मागे घेतल्यानंतर पाकिस्तानी लष्कराच्या सूचनेनंतर सरकारने हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. लष्करप्रमुख बाजवा यांनी काही दिवसांपूर्वी गिलगिटच्या मुद्यावर विरोधी पक्षांसोबत काही दिवसांपूर्वी लष्करी मुख्यालयात बैठक आयोजित केली होती. यामध्ये नवाज शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ, आसिफ अली जरदारी यांचे पुत्र बिलावल भुट्टो यांच्यासह इतर राजकीय नेते उपस्थित होते. गुप्तचर संघटना आयएसआयचे नेतेही उपस्थित होते. गिलगिट-बाल्टिस्तानला राज्याचा दर्जा देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.

भारताकडून पाकव्याप्त काश्मीरवर कारवाई होण्याची भीती आहे. त्यातच चीनकडून या भागात अब्जावधींची गुंतवणूक झाली आहे. या पार्श्वभूमीवर गिलगिटला एका राज्याचा दर्जा देण्याची आवश्यकता असल्याचे लष्करप्रमुख बाजवा यांनी सांगितले.

पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तानच्या मुद्यावर माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मुलगी आणि पाकिस्तान मुस्लिम लीगच्या उपाध्यक्षा मरियम नवाज यांनी लष्कराला आपल्या मर्यादेत राहण्यास सांगितले आहे. राजकीय निर्णय घेण्याचा अधिकार हा संसदेला आहे. पाकिस्तानी लष्करप्रमुखांच्या कार्यालयातून असे निर्णय होणे चुकीचे आहेत. लष्कराच्या मुख्यालयात कोणत्याही राजकीय नेत्याला बोलावता कामा नये आणि कोणीही जाता कामा नये असेही त्यांनी म्हटले. पाकिस्तानी लष्कर मुख्यालयात झालेल्या बैठकीत आपल्या पक्षाचा एकही प्रतिनिधी नव्हता असा दावाही त्यांनी केला.

भारताने याआधीच पाकिस्तानने असा कोणताही निर्णय घेऊ नये असा इशारा दिला होता. पाकव्याप्त काश्मीर हा जम्मू-काश्मीर राज्याचा अविभाज्य भाग आहे. पाकिस्तानने अवैधपणे भारताचा हा भूभाग बळकावला आहे. पाकिस्तानने या भागात कोणताही बदल करू नये आणि या भागाचा ताबा सोडून देण्याची मागणी भारताने केली होती. या भागात निवडणूक घेण्यासही भारताने विरोध दर्शवला आहे.

Protected Content