पहूर येथे कोरोनाचा संसर्ग वाढला; बाजारातील गर्दीपुढे प्रशासन हतबल

पहूर, ता. जामनेर रवींद्र लाठे । येथे कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला असतांनाच नागरी वस्तीमध्ये भरणार्‍या बाजारात गर्दी उसळत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे कोरोनाच्या प्रतिकारासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे प्रशासन लोकांच्या हट्टीपणापुढे हतबल झाल्याचे आजचे चित्र आहे.

पहूर येथे कोरोना संसर्गाचा विळखा दिवसेंदिवस अधिकच वाढत असून बाधितांचा आकडा १८ वर पोहचला आहे. तरीही संवेदनशुन्य व्यावसायीक नागरी वस्तीमध्ये आठवडे बाजार भरवित असल्याने नागरीकांची तोबा गर्दी होवून फिजीकर डिस्टंन्सींगचा फज्जा उडत आहे. यातून सामान्य नागरीकांच्या जिवाशीच खेळ खेळला जात असल्याचे बोलल्या जात आहे. हा बाजार पोलीस स्टेशनच्या अगदी जवळ हाकेच्या अंयरावर भरत असून क्वारंटाईन सेंटरला लागूनच आहे. या प्रकारातून प्रशासनाची हतबलता दिसत असून पहूर पेठ व पहूर कसबे ग्रामपंचायतीचे या कडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
लॉकडाऊन पासून सर्वत्र आठवडे बाजार बंद असून पहूरमध्ये मात्र व्यावसायिकांना बाजार भरविण्याची राजकिय मुभाच दिली गेल्याचे दिसत आहे. या बाजारात पहूर सह परिसरातील तसेच तालुक्याबाहेरूनही व्यावसायीक , व्यापारी व खरेदीसाठी नागरीक येत असल्याने कोरोना संसर्गाला पोषक वातावरणच मिळत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, सध्या जमावबंदीचा आदेश असला तरी सुध्दा पोलीस प्रशासन डोळे असून आंधळे झाल्याचा आव आणत आहे.
बस स्थानकावरही व्यावसायीकांना ११ ते ५ ची वेळ ठरविलेली असतानाही सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने सुरुच आहेत. फिजीकल डिस्टन्सींगचे तर सोडाच सर्व व्यावसायिक वेळेचे बंधन पाळत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. अनेक जण मास्क, किंवा साधा रूमालही लावतांना दिसत नाही. कोरोना सारख्या महाभयंकर आजाराने पहूर गावास विळखा घातला असून अजूनही लोक गांभीर्याने घेत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.

तसेच, बाजार भरवायचाच असेल तर दोन्ही ग्रामपंचायतींनी व्यावसायीकांना तात्पुरती जागा उपलब्ध करून द्यावी . इतर ठिकाणी व्यावसायीकांना प्रशासनाने बाजारासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून दिलेली आहे . त्या धर्तीवर पहूर येथेही अशी व्यवस्था करायला हवी , ज्यामुळे तेथे सोशल डिस्टंन्सीगचे पालन होवून संसर्गाला आळा घालता येईल. तर, नुतन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या कडे लक्ष देण्याची अपेक्षा येथील नागरीकांकडून व्यक्त केली जात आहे.

Protected Content