पश्चिम बंगाल : राज्यपालांच्या बैठकीतून भाजपाचे ७४ पैकी २४ आमदार ‘गायब’

 

 

कोलकाता : वृत्तसंस्था । पश्चिम बंगालमध्ये   भाजपा आमदारांनी  राज्यपाल जगदीप धनखर यांची सुवेंदु अधिकारी यांच्यासोबत  भेट घेतली. मात्र या बैठकीमध्ये भाजपाचे २४ आमदार अनुपस्थित असल्याने राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आलंय.

 

भाजपामधून पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये होणारी घरवापसी रोखण्यासाठी भाजपा पूर्ण प्रयत्न करत आहे. मात्र यामध्ये भाजपाला फारसं यश येताना दिसत नाहीत.

 

भाजपा नेत्यांनी राज्यपालांसोबत घेतलेल्या बैठकीचा हेतू बंगालमध्ये सुरु असणाऱ्या अयोग्य घटनांबद्दलची माहिती राज्यपालांना देण्याचा आणि इतर महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्याचा होता. मात्र भाजपाच्या ७४ पैकी २४ आमदार यावेळी गैरहजर होते. त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीआधी तृणमूलमधून भाजपामध्ये आलेले नेते पुन्हा घरवापसी करणार का अशापद्धतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांपैकी काही आमदारांचा गट सुवेंदु अधिकारी यांचं नेतृत्व स्वीकारण्यास तयार नसल्याने भाजपामध्ये पक्षांतर्गत दुही असल्याचही सांगण्यात येत आहे.

 

अनेक आमदारा नाराज असून काहीजण तृणमूलच्या संपर्कात आहेत. अनेक भाजपा आमदार पुन्हा तृणमूलमध्ये प्रवेश करु शकतात, मागील आठवड्यामध्ये मुकुल रॉय यांनी भाजपामधून पुन्हा तृणमूलमध्ये प्रवेश केला. राजीव बॅनर्जी, दीपेंदु विश्वास आणि सुभ्रांशु रॉय यांच्यासहीत इतर अन्य नेते सुद्धा लवकरच तृणमूलमध्ये परततील असा अंदाज व्यक्त केला जातोय. मुकुल रॉय यांनी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली असून त्यांनी कृष्णानगर उत्तर मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

 

दुसरीकडे मुकुल यांच्यासोबत तृणमूल सोडणाऱ्या आणि आता पुन्हा पक्षात येऊ पाहणाऱ्या नेत्यांबद्दल पक्षाकडून पुन्हा सकारात्मक विचार केला जाईल असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी आधीच स्पष्ट केलं आहे. ३० हून अधिक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा तृणमूलने केला आहे. रॉय यांच्या आधी सोनाली गुहा आणि दीपेंदु बिस्वाससारख्या नेत्यांनी थेट समोर येत तृणमूलमध्ये परत येण्याची इच्छा व्यक्त करत मुख्यमंत्री बॅनर्जी यांची माफी मागितली होती.

 

अधिकारी यांनी सोमवारी मुकुल रॉय यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा नाही दिला तर त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी आपण विधानसभा अध्यक्षांकडे पक्षांतर कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी करणारा अर्ज करु असं म्हटलं आहे. रॉय यांचा थेट उल्लेख न करता अधिकारी यांनी, “कृष्णानगर उत्तर मतदारसंघातील आमदाराने पक्षांतर केलं आहे. आम्हाला अपेक्षा आहे की ते विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देतील. जर त्यांनी उद्यापर्यंत राजीनामा नाही दिला तर आम्ही बुधवारी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून पक्षांतर कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी करु,” असं अधिकारी यांनी म्हटलं आहे.

 

भाजपाचे राष्ट्रीय महासचिव भूपेंद्र यादव आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद या दोघांचा सल्ला घेऊन मुकुल रॉय यांच्याविरोधातील कायदेशीर लढाईबद्दल निर्णय घेतला जाईल असं अधिकारी म्हणाले आहेत.

 

Protected Content