राज्यातील साखर कारखान्यांची ऑक्सिजन निर्मितीची तयारी

 

पुणे : वृत्तसंस्था । शरद पवारांच्या आवाहनानंतर अनेक साखर कारखाने ऑक्सिजन निर्मितीसाठी पुढे येत आहेत.

 

आपलं राज्य आत्मनिर्भर व्हावं, स्वतःच्या पायावर आपण उभं राहावं तसंच इतर राज्यापुढे हात पसरवण्याची वेळ येऊ नये अशी मुख्यमंत्री आणि शरद पवारांची इच्छा आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट येथे  शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे. या बैठकीआधी राजेश टोपेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

 

“आशा वर्करबाबत माझी युनिअनसोबत सविस्तर चर्चा झाली आहे. तिसर्‍या लाटेच्या उंबरठ्यावर असल्याने ते आंदोलन करणार नाहीत. तरीदेखील ते आंदोलन करणार असतील, तर ते चुकीचे आहे. आशा वर्करबाबत मुख्यमंत्री यांच्या सोबत चर्चा करून प्रश्न मार्गी लावले जातील,” असं आश्वासन राजेश टोपे यांनी यावेळी दिलं.

 

“जोवर केंद्राच्या कायद्यात बदल होत नाही तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकत नाही. त्यांनी बदल करावा, आपण तो स्विकारणार आहोत. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. मात्र ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता दिले पाहिजे. हीच अपेक्षा महाविकास आघाडी सरकारची आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

 

“सिंधुदूर्ग, रायगड, कोल्हापूर आणि सातारा येथे पाच टक्क्यांपेक्षा जास्त दर आहे. त्या ठिकाणी आमचं लक्ष असून लवकरच तेथील परिस्थिती नियंत्रणात येईल,” असा विश्वास राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.

 

“केंद्राने अधिकाधिक लस द्यावी. आतापर्यंत आपण तीन कोटी नागरिकांचे लसीकरण केले आहे, १३ कोटी लसीकरण करणे बाकी आहे. उर्वरित राहिलेले लसीकरण देखील तीन ते चार महिन्यात पूर्ण करू. मात्र आपल्याला केंद्र सरकारने सहकार्य करण्याची अपेक्षा आहे,” असं राजेश टोपेंनी म्हटलं आहे.

 

“राज्य सरकाराच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत १३३ रुग्णालयात म्युकरमायकोसिस आजारावरील रुग्णांवर उपचार मोफत केले जात आहेत. त्या आजारासाठी एमफोटेरिसिन इंजेक्शन मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत. जे खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत त्यांच्याकडून रुग्णालयाने इंजेक्शनसाठी जादा पैसे घेऊ नये,” अशी सूचना राजेश टोपेंनी यावेळी केली.

Protected Content