पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाचा संभाव्य धोका, मुंबईकरांसाठी सतर्कतेचा इशारा

मुंबई वृत्तसंस्था । महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर ३ जून रोजी निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबईकर नागरिकांनीही आवश्यक ती खबरदारी आपल्या स्तरावर बाळगावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्याचे रुपांतर चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ बुधवारी पश्चिम किनारपट्टी भागावर धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या कालावधीमध्ये वेगवान वारे वाहण्याची शक्यता असून सोबत जोरदार पाऊस देखील कोसळू शकतो. ही स्थिती लक्षात घेता महापालिकेचा मुख्य नियंत्रण कक्ष आणि विभागवार नियंत्रण कक्ष पुरेशा मनुष्यबळासह सज्ज करण्यात आले आहेत. तटरक्षक दल, नौदल, मुंबई अग्निशमन दल यांच्यासह राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथके सुसज्ज करण्यात येत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही महानगरपालिका प्रशासनाकडून तातडीने हाती घेण्यात आली आहे.

मुंबईतील सर्व २४ विभाग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना आपल्या विभागातील संभाव्य धोका पोहोचू शकणाऱ्या वसाहती तसेच सखल भागातील वसाहती निश्चित करण्याच्या सूचना आहेत. तिथल्या रहिवाशांना जवळपासच्या शाळांमध्ये अथवा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Protected Content