कोल्हापूर: वृत्तसंस्था । निर्यातबंदी आणि कोरोनामुळे उठावच न झाल्याने देशात गत हंगामातील ११५ लाख मे. टन साखर अजूनही गोडावूनमध्ये अडकली आहे. यंदा विक्रमी उत्पादन होणार असल्याने ४३८ लाख मे. टन साखर शिल्लक पडली तर त्याचे करायचे काय या प्रश्नाने कारखानदारांची झोप उडण्याची चिन्हे आहेत.
परतीच्या पावसाच्या दणक्याने हंगाम लांबणार असल्याने संपूर्ण ऊस गाळपाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.गेल्यावर्षी ऊसाचे क्षेत्र कमी असल्याने देशात केवळ २७२ लाख मे. टन साखरेचे उत्पादन झाले होते. त्यामागील वर्षातील शिल्लक साखर व गतवर्षीचे उत्पादित असे मिळून देशात ४१७ लाख मे. टन साखर देशात उपलब्ध होती कोरोनामुळे त्याला मागणीच आली नाही.
केवळ ५९ लाख मे. टनाची निर्यात विविध देशात झाली. साखरेला अपेक्षित दर नसल्याने कारखान्यांनी त्याची विक्री न करता गोडावूनमध्येच ठेवली. त्यामुळे बहूतांशी कारखान्यांचे गोडावून आजही हाऊसफुल्ल आहेत. किलोला दोन रूपये दर वाढवून देण्याचा कारखान्यांना मान्य नसलेला सरकारचा प्रस्ताव आहे. पण त्याबाबतही निर्णय झाला नाही.
यंदा देशात विक्रमी साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. कारण पाऊसमान चांगले असून ऊसाचे क्षेत्रही वाढले आहे. नव्या हंगामात ३२० लाख मे.टन साखर उत्पादित होणार आहे. त्यामध्ये गतवर्षीचे व नवीन उत्पादित असे तब्बल ४३८ लाख टन साखर यंदा देशात उपलब्ध होणार आहे. निर्यात बंदी,मागणीचा अभाव यामुळे साखर गोडावूनमध्ये अडकणार आहे. साखर ठेवायची कुठे हा मोठा प्रश्न कारखानदारांसमोर आहे. यातच बफर स्टॉक योजनेची अमंलबजावणी थांबविल्याने कारखानदारांची झोप उडणार आहे.
देशात अनेक राज्यात परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे उसतोडणी आणखी काही दिवस शक्य नसल्याने हंगामाची सुरुवात लांबणीवर पडणार आहे. यामुळे वेळेत हंगाम संपवतानाच कारखाना पूर्ण क्षमतेने चालविण्याचे मोठे आव्हान कारखानदारांसमोर राहणार आहे. महाराष्ट्रात गतवेळी केवळ ६२ लाख मे. टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा १०१ मे. टन उत्पादन होणार असल्याने राज्यातील कारखाने अधिक अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.