देशात कोरोनासाठी आणखी सहाहून अधिक लशींची निर्मिती होणार

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशात कोरोना प्रतिबंधासाठी आणखी सहाहून अधिक लशींची निर्मिती होणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केली.

 

देशात आतापर्यंत कोरोनाच्या दोन लशींची निर्मिती करण्यात आली असून त्या ७१ देशांना देण्यात आल्या आहेत. आणखी अनेक देश लशींची मागणी करत आहेत. कॅनडा, ब्राझील आणि इतर विकसित देशही भारतीय लशींचा उत्साहाने वापर करत आहेत, असे हर्षवर्धन म्हणाले. भोपाळ येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रीसर्च एनव्हायर्नमेंटल हेल्थ’च्या नव्या ग्रीन कॅम्पसच्या उद््घाटनप्रसंगी आरोग्यमंत्री बोलत होते.

 

देशात शनिवार पर्यंत लशीच्या एक कोटी ८४ लाख मात्रा नागरिकांना देण्यात आल्या आहेत. त्यापैकी २० लाख मात्रा शुक्रवारी एकाच दिवसात देण्यात आल्या, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

 

पूर्वी देशात संसगाचे निदान करण्यासाठी एकच प्रयोगशाळा होती, मात्र आता आपल्याकडे अशा २,४१२ प्रयोगशाळा आहेत, याचा हर्षवर्धन यांनी उल्लेख केला. आतापर्यंत २३ कोटी चाचण्या झाल्या आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.

 

विज्ञानाचा आदर करा. कोरोनाविरुद्धचा लढा हा वैज्ञानिक लढा आहे, राजकीय नाही. त्यामुळे लशीवरून होणारे राजकारण बंद करण्याची आवश्यकता आहे, असेही हर्षवर्धन म्हणाले.

 

देशातील वाढत्या प्रादुर्भावाबद्दल हर्षवर्धन म्हणाले की निष्काळजीपणा आणि गैरसमजुतींमुळे संसर्गात वाढ होत आहे. लस आल्यामुळे आता सगळे काही ठीक होईल, असे लोकांना वाटते. परंतु संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

: कोव्हिशिल्ड लशीच्या दोन मात्रा घेतल्यानंतरही चंद्रपूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दोन डॉक्टरांना संसर्ग झाला आहे. लशीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवसांनी डॉ. गहलोत यांच्यासह डॉ. अनंत हजारे आणि त्यांच्या डॉक्टर पत्नीला संसर्ग झाला.

 

नियम, प्रतिबंधात्मक उपायांकडे दुर्लक्ष आणि वाढती गर्दी यामुळे  प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. परंतु परिस्थिती अद्याप नियंत्रणात असून हॉटेल आणि उपाहारगृहांनी नियमांचे पालन करावे, कडक टाळेबंदी लावण्यास भाग पडू नये, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिला. आपल्याला कोरोनासह जगायचे असून जीवनपद्धती त्याला अनुरूप करावी लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Protected Content