देवळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवारी अर्जावरून एकास मारहाण

चाळीसगाव प्रतिनिधी । ग्रामपंचायत निवडणुकीत बायकोचा उमेदवारी अर्ज मागे का घेतला नाही म्हणून एकास मारहाण करून दुखापत केल्याची घटना २८ फेब्रुवारी रोजी ४.३० वाजताच्या सुमारास तालुक्यातील देवळी येथे घडली होती. याबाबत ८ मार्च रोजी मेहूणबारे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

मिळालेली माहिती अशी की, तेलाराम पांडुरंग पाटील (वय-४० रा. देवळी) ता. चाळीसगाव हे आपल्या आई गुमानबाई पाटील, पत्नी रेखाबाई पाटील, मुलगी कु. शितल व मुलगा महेश परिवारासह वास्तव्यास आहेत. मात्र २८ फेब्रुवारी रोजी दुपारी ४:३० वाजताच्या सुमारास तेलाराम पाटील हा आपल्या घरात असताना अनिल भास्कर पाटील व यशवंत माणीक पाटील हे दोघेही घरासमोर येऊन तेलाराम बाहेर ये सांगून रविंद्र माणीक पाटील, यशवंत माणीक पाटील, अनिल भास्कर पाटील, रविंद्र नारायण पाटील व जिभाऊ रविंद्र पाटील आदींनी ग्रामपंचायत निवडणुकीत तु बायकोचा उमेदवारी अर्ज मागे का घेतला नाही म्हणून शिवीगाळ करत बेदम मारहाण केली.

बायको रेखा पाटील हे मध्ये सोडवायला गेल्या असता त्यांनाही धक्काबुकी करत गळ्यातील पोत तोडून नुकसान पोहोचवला. या वादात तेलाराम पांडुरंग पाटील यांना जबर दुखापत झाली. त्यामुळे उपचारासाठी चाळीसगाव येथील निरामय हॉस्पिटलात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर पुढील उपचारासाठी धुळे येथील दवाखान्यात १ मार्च ते ४ मार्च पर्यंत उपचार घेण्यात आले. ४ मार्च रोजी सायंकाळी तेलाराम पाटील यांना दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आले. त्यामुळे रविंद्र माणीक पाटील, यशवंत माणीक पाटील, अनिल भास्कर पाटील, रविंद्र नारायण पाटील व जिभाऊ रविंद्र पाटील यांच्या विरुद्ध मेहूनबारे पोलिस ठाण्यात तेलाराम पाटील यांनी फिर्याद दाखल केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.

Protected Content