देवभूमितील प्रकल्पांचे प्रहार थांबवा : शिवसेनेचा सल्ला

 

मुंबई प्रतिनिधी । केवळ हिमालयाच्या गुहेत ध्यानधारणा करून देवभूमीचे रक्षण होणार नाही. त्यासाठी देवभूमीवरील प्रकल्पांचे प्रहार थांबवावे लागतील, असा सल्ला आजच्या सामना अग्रलेखातून पंतप्रधान मोदींना देण्यात आला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनातल्या अग्रलेखातून आज पंतप्रधान मोदी यांच्यावर उत्तराखंडातील दुर्घटनेवरून टीका करण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, सात वर्षांपूर्वी केदारनाथ तीर्थक्षेत्राच्या परिसरात जो भयंकर प्रलय आला आणि त्याने जो विध्वंस घडविला त्यापासून आपण काहीही बोध घेतला नाही किंवा शहाणे झालो नाही हेच देवभूमीतील ताज्या प्रलयाने सिद्ध केले आहे. हिमालय पर्वताच्या कुशीत विसावलेल्या उत्तराखंडातील चमोली जिल्ह्यात रविवारी हिमकडा किंवा हिमनदीचा पृष्ठभाग कोसळून धौलीगंगा नदीला संहारक म्हणावा असा महापूर आला. शासन, प्रशासन, जनता यापैकी कोणालाही काही कळण्याच्या आत सुमारे दहा किलोमीटरच्या परिसरात या जलप्रलयाने अक्षरशः हाहाकार उडवला.

यात पुढे म्हटले आहे की, जिवाचा थरकाप उडविणार्‍या या रौद्र प्रलयाने २०१३ मधील केदारनाथच्या विध्वंसाचीच आठवण करून दिली. केदारनाथमधील दुर्घटनेनंतरच हिमकडा कोसळून अशा प्रकारची दुर्घटना घडू शकते, असा इशारा तज्ञांनी दिला होता. त्या इशार्‍याकडे केलेले दुर्लक्षच आता महागात पडले आहे. केदारनाथच्या भयंकर दुर्घटनेनंतर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने तज्ञांची जी उच्चस्तरीय समिती नेमली होती त्या समितीने उत्तराखंड आणि एकूणच हिमालयात जे जलविद्युत प्रकल्प उभे राहत आहेत ते भयंकर आपत्ती घडवू शकतात, असे आपल्या अहवालात म्हटले होते. इतकेच काय अशा ऊर्जा प्रकल्पांमुळेच केदारनाथची दुर्घटना घडली, असा ठपकाही समितीने ठेवला होता. या समितीच्या अहवालानंतर सर्वोच्च न्यायालयाने गंगेच्या खोर्‍यातील चोवीस जलविद्युत प्रकल्पांना स्थगिती दिली होती, मात्र न्यायालयाच्या निर्णयापूर्वी सरकारने सखोल अभ्यास करण्याच्या नावाखाली आणखी एक समिती नेमण्याचे कारण पुढे करून हा गंभीर विषय प्रलंबित ठेवला.

 

यात नमूद केले आहे की,  उत्तराखंडमधील या दुर्घटनेमागे ग्लोबल वॉर्मिंग हे कारण असेलही, मात्र तज्ञांच्या समितीने हिमालयातील ऊर्जा प्रकल्प भविष्यात काळ बनून येतील, असा इशारा दिल्यानंतरही पर्यावरणाची ऐशीतैशी करणारे ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा अट्टहास हवाच कशाला? एकीकडे हिमालयाला देशाचे कपाळ म्हणायचे, उत्तराखंडला देवभूमी म्हणून संबोधायचे आणि दुसरीकडे दानव बनून त्याच देवभूमीच्या कपाळावर अहोरात्र खोदकाम करून जीवघेणे प्रकल्प उभे करायचे याला काय म्हणावे? असे यात म्हटले आहे.

Protected Content