दिल्लीतील हिंसाचारानंतरही मोदी-शहा गप्प का?; संजय राऊतांचा सवाल

मुंबई: वृत्तसंस्था । दिल्लीतील शेतकरी आंदोलनातील हिंसाचारानंतर आंदोलन कसे राष्ट्रदोही आहे यावर भाजपचा आयटी विभाग समाज माध्यमांवर प्रवचने झोडत आहे. पण शेवटी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा यांची काहीच जवाबदारी नाही का ?, ते गप्प का आहेत? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी दैनिक ‘सामना’तील ‘रोखठोक’ सदरातून शेतकरी आंदोलनावरून मोदी-शहांना घेरले आहे. शेतकऱ्यांचा एक गट दिल्लीत घुसला व त्याने दंगल केली. राज्यकर्त्या पक्षाच्या प्रेरणेनेच जेव्हा दंगली होतात, तेव्हा अंहिसेवरील प्रवचने उपयोगी पडत नाहीत. मोदी व शहा हे इतर वेळी राहुल गांधीपासुन ममता बँनर्जीपर्यंत राजकीय विरोधंकावर बरसत असतात पण दिल्लीत २६ जानेवारी रोजी इतका मोठा हिंसाचार झाला त्यावर ना पंतप्रधान बोलले ना आपले गृहमंत्री, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

मोदी व शहा हे आज प्रमुख घटनात्मक पदांवर बसुन देशाचे नेतृत्व करत आहेत. पंजाबच्या शेतकऱ्यांशी असे वागणे म्हणजे देशात अशांततेची नवी ठिणगी टाकणे आहे. दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनात सरकारने फूट पाडली. लाल किल्ल्यातील घुसखोरी ही जणू फूट पाडण्यासाठीच होती. राजकारण देशाला अस्थिरतेकडे ढकलत आहे ते थांबायला हवं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

शिखांमध्ये एकदा बंडाची ठिणगी पडली की, काय होते याचा अनुभव देशाने पूर्वी घेतला आहे. म्हणून दिल्लीतील आंदोलक शेतकऱयांचा विषय पंजाब समस्येशी निगडित आहे व पंजाब अशांत होईल असे काहीही घडू नये. २६ जानेवारी रोजी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेले शेतकरी सरळ दिल्लीत घुसले व त्यांनी काही काळासाठी लाल किल्ल्याचा ताबा घेतला. दिल्लीच्या रस्त्यांवर आणि लाल किल्ल्यावर काही काळासाठी ‘युद्ध’ परिस्थिती निर्माण झाली. ‘हे धर्मयुद्ध आहे’ असा शेरा यावर कुणीतरी मारला. दिल्लीच्या सीमेवर ६० दिवसांपासून जे शेतकरी जमले आहेत, त्यांना कोणताही धर्म नाही व राजकीय पक्ष नाही. आपली शेती, पुढच्या पिढीचे भविष्य कॉर्पोरेट दलालांच्या हाती जाऊ नये यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहेत.

आपापल्या ट्रक्टरसह ते दिल्ली शहरात घुसले तेव्हा अनेक भागांत लोकांनी त्यांच्यावर फुले उधळली. मग दिल्लीकरांनी खलिस्तानवाद्यांवर फुले उधळली असे कुणाला वाटत आहे काय? शेतकरी हिंसक झाले व त्यांना तशी चिथावणी देण्यात आली. हे चिथावणी देणारे व शेतकऱयांना लाल किल्ल्यात घेऊन जाणारे नेते शेवटी भाजप परिवारातील निघावेत यासारखा विनोद तो कसला? दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा प्रश्न पंजाबातील गाडलेल्या समस्येशी जोडला जात आहे. पंजाब अशांत करू नका, असे शरद पवारांसारखे नेते वारंवार सांगत आहेत. त्यामागचे सत्य समजून घेण्याची राज्यकर्त्यांची मानसिकता नाही.

शेतकऱ्यांचे नेते राष्ट्रपती भवनात जाऊन कैफियत मांडून आले, पण उपयोग काय? देशाच्या घटनात्मक प्रमुखांना ६० दिवस सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्रातील शेतकरी पंजाबच्या शेतकऱयांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत आला. हजारो शेतकरी राजभवनाला धडक देण्यासाठी निघाले. त्यांना अडवून ठेवले. शेतकऱयांचे नेते राज्यपाल कोश्यारी यांना निवेदन देण्यास निघाले तेव्हा आपले महामहिम राज्यपाल हे गोव्याच्या दौऱयावर असल्याचे सांगण्यात आले. एरवी आपले राज्यपाल राज्याचे व लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःच पुढाकार घेत असतात, पण हजारो शेतकरी स्वतःच आपले प्रश्न घेऊन राजभवनाकडे निघाले तेव्हा शेतकऱयांचे प्रश्न सोडविण्याची आयतीच संधी नाकारून राज्यपाल गोव्यास गेले.

Protected Content