दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षाविषयक मार्गदर्शन

 

भुसावळ, प्रतिनिधी ।  दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांना परीक्षाविषयक मार्गदर्शन करण्यासाठी विविध विषयतज्ज्ञांशी संवाद साधण्याचे काम डॉ. मनिषा जगताप करत आहे. 

आतापर्यंत दोन्ही वर्गांचे सुमारे पंधरा विषयांबाबत मार्गदर्शन सत्रे पार पडली असून उर्वरित विषयांचे मार्गदर्शन दररोज एज्युस्ट्रीम यूट्यूबच्या दहावी-बारावी परीक्षा यशोमंत्र मालिकेच्या माध्यमातून केले जात आहे. एप्रिल व मे महिन्यात दहावी व बारावीच्या परीक्षा जाहीर झाल्या आहेत. गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांचे काही ऑनलाईन तर काही ऑफलाईन पद्धतीचे अध्यापन कार्य पार पडले आहे. तसेच काही पाठ्यपुस्तकांमधील पाठ्यघटकही वगळण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत दहावी-बारावीच्या परीक्षा कशा होतील आणि त्याला सामोरे कसे जायचे याविषयी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेला गोंधळ दूर करण्यासाठी जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील बहिस्थ शिक्षण आणि अध्ययन विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. मनीषा वसंतराव जगताप यांनी व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी दहावी आणि बारावी परीक्षा यशोमंत्र ही मालिका सुरू केली आहे. यासाठी  सूत्रधार म्हणून रविकिरण सावळे तर तंत्रसहाय्य म्हणून पायस सावळे यांचे सहकार्य लाभत आहे. परीक्षेचे स्वरूप, गुणदान पद्धती, उत्तरे लेखनाची शैली, बोर्ड परीक्षेला अपेक्षित असलेली लेखन पद्धती, परीक्षेला सामोरे कसे जायचे आणि सर्वात महत्वाचे पालकांनी कोणती काळजी घ्यावी यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे. हे मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. मनीषा जगताप राज्यभरातील विविध विषयतज्ज्ञांना एज्युस्ट्रीम यूट्यूबच्या यशोमंत्र मालिकेत आमंत्रित करत आहेत.

आतापर्यंत इयत्ता दहावी इंग्रजी – प्रमोद आठवले भुसावळ, भूगोल – वंदना तायडे जळगाव, संस्कृत – सुषमा परांजपे नाशिक, मराठी – मनीषा सावळे नाशिक, गणित – वैशाली पवार नाशिक, हिंदी मंजुषा ओस्तवाल चांदवड यांनी तर बारावी मराठी – डॉ. जगदीश पाटील भुसावळ, अकाउंटन्सी – प्रा. दिनेश राठी भुसावळ, मानसशास्त्र – डॉ. सतीश सूर्ये नंदुरबार, गणित – प्रा. वसंत पाटील नंदुरबार व  प्रा. ललिता धांडे भुसावळ, अर्थशास्त्र – प्रा. संतोष झंवर जळगाव, हिंदी – डॉ. राजेंद्र पाटील धुळे, ओसीएम – प्रा. कल्पेश चोरडिया चांदवड यांनी मार्गदर्शन केले आहे.

येत्या काही दिवसात दहावीच्या उर्दू, विज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र तर बारावीच्या समाजशास्त्र, इतिहास, इलेक्ट्रॉनिक्स, बायोलॉजी, हिंदी, इंग्रजी, सेक्रेटरी प्रॅक्टिस, भूगोल, विज्ञान, उर्दू, राज्यशास्त्र, माहिती व तंत्रज्ञान, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी यासोबतच किमान कौशल्य शाखेच्या विषयांचेही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

यशोमंत्र मालिकेमुळे परीक्षा होणार सुलभ –

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आगामी परीक्षेसाठी डॉ. मनीषा जगताप यांनी विविध विषयतज्ज्ञांच्या माध्यमातून सुरू केलेली यशोमंत्र ही मालिका विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. या मालिकेमुळे परीक्षा सुलभ होण्यासाठी मदत होणार असल्याने विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य  डॉ. जगदीश पाटील यांनी केले आहे.

Protected Content