चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा गावातील शेतकऱ्याचा गावाजवळून वाहणाऱ्या तीतूर नदीच्या पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. शासनाच्या वतीने मयत कैलास पाटील यांच्या कुटुंबियांना ४ लाख रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा गावातील शेतकरी कैलास पाटील यांचा गावाजवळून वाहणाऱ्या तीतूर नदीच्या पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. घरातील एकमेव कर्ता गेल्याने पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाल्याने शासकीय मदत मिळावी यासाठी त्यांनी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण व पंचायत समिती गटनेते संजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ तहसीलदार यांना सूचना देऊन शासनातर्फे जास्तीत जास्त मदत मयत कैलास पाटील यांच्या कुटुंबियांना देण्यात येण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार मयत कैलास पाटील यांच्या पत्नी श्रीमती निलाबाई कैलास पाटील यांच्या नावाने ४ लाख रुपये मदतीचा धनादेश आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते वितरित करण्यात आला.

यावेळी तहसीलदार अमोल मोरे, पंचायत समिती गटनेते संजय पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शहर पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, नायब तहसीलदार विशाल सोनवणे व मयत कैलास पाटील यांचे कुटुंबीय उपस्थित होते.


