तामिळनाडूत अडकलेल्या विद्यार्थ्यांचे आगमन; पालकमंत्र्यांनी केले स्वागत

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे तामिळनाडू येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या सात बसेसचे आज सकाळी जळगाव मध्यवर्ती बसस्थानकात आगमन झाले. त्याप्रसंगी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी सॅनिटायझर देवून त्यांनी त्यांच्या भोजनाचीही व्यवस्था केली होती. दरम्यान, आपल्या गावी सुखरूप पोहचल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला. तसेच दोन महिन्यापासुन लेकरांच्या भेटीची आस लागलेल्या पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रु तरळले.

कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे गेल्या दोन महिन्यांपासून तामिळनाडू येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती. त्यांना आर्थिक अडचणींसह विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने ते चिंताग्रस्त झाले होते. विद्यार्थ्यांच्या पालकांनी व स्वतः विद्यार्थ्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधून अडकलेल्या विद्यार्थ्यांना जळगावात आणण्याची विनंती केली होती. त्यानुसार शासनाकडे सतत पाठपुर करून ना. पाटील यांनी सकारात्मक विचार करून ही मागणी पूर्ण केली.

पालकमंत्र्यांनी केला होता पाठपुरावा
६ एप्रिल २०२० रोजी कॅबिनेटची ऑनलाईन बैठक घेण्यात आली होती. त्यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी राज्यासह जिल्ह्यातील विद्यार्थी लॉकडाऊनमुळे तामिळनाडू व केरळ राज्यात अडकलेले असल्याने त्यांना महाराष्ट्रात आणण्याची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे केली होती. मंत्रीमंडळाकडून यावर सकारात्मक भुमीका दर्शविली गेली होती.

तामिळनाडू राज्यात जिल्ह्यातील जवळपास १६० विद्यार्थीं अडकले होते. पालकमंत्री ना. पाटील यांचा विद्यार्थ्यांशी थेट संपर्क सुरू होता. दरम्यान मंत्रीमंडळाने परप्रांतीयांना त्यांच्या मुळगावी तर इतर राज्यात अडकलेले नागरिक व विद्यार्थ्यांना आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी ना. गुलाबराव पाटील यांनी राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संपर्क साधून जळगाव जिल्ह्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना देखील आणण्यासाठी पाठपुरावा केला. अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतल्यानंतर १६० विद्यार्थ्यांना तामिळनाडू येथून थेट सांगली (मिरज) येथे आणण्यात आले. तेथून बसेसद्वारे जळगावपर्यंत विद्यार्थ्यांना पोहचविण्यात आले.

जळगाव मध्यवर्ती बसस्थानकात आज १६० विद्यार्थ्यांना घेवून सात बसेस दुपारी १२ वाजेच्या सुमारास दाखल झाल्यात. आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सॅनिटायझर देवून स्वतः पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी स्वागत केले. आलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शिवभोजनतर्फे जेवणाची व्यवस्था करण्यात आली. बसने जळगाव बसस्थानकात होताच विद्यार्थ्यांनी एकच आनंद व्यक्त केला. गेल्या दोन महिन्यांपासून परराज्यात अनेक अडचणींना सामना करावा लागला होता. मात्र पालकमंत्री ना. पाटील यांचा आमच्याशी वेळवेळी थेट संपर्क करून दिलासा देत होते. अश्या भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्यात. आपण आपल्या गावी आल्याचे पाहून काही विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसून येत होते तर विद्यार्थ्यांसह त्यांच्या नातेवाईकांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे आभार मानले.

यांची होती उपस्थिती
यावेळी विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे,आगार व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे, आगार स्थानक प्रमुख निलीमा बागुल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, सेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, रमेश पाटील यांच्यासह विद्यार्थ्यांचे नातेवाईक व मित्र परिवार उपस्थित होते.

पालकमंत्रीनी प्रशासनाचे मानले आभार !
गेल्या महिन्यात झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत जिल्ह्यातील अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी मुद्दा मंत्रीमंडळाकडे उपस्थित केला होता. त्यावेळी सकारात्मक भूमिका मिळाली होती. दरम्यान लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या १६० विद्यार्थ्यांना आणण्यासाठी जिल्हा प्रशासन, राज्य परिवहन मंडळाचे चालक व कर्मचारी, दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचे सहकार्य मिळाल्याने त्यांचे व शासनाचे ना. पाटील यांनी आभार व्यक्त केले आहे. व कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात ‘घरी राहा, सुरक्षित रहा, अनावश्यक बाहेर पडून नका’ असा मोलाचा संदेशही त्यांनी जिल्हावासीयांना दिला आहे.

Protected Content