तामिळनाडुत ६०० कोटींचा घोटाळा करून ‘हेलिकॉप्टर बंधू’ फरार

 

चेन्नई : वृत्तसंस्था । भाजपा व्यापारी संघाचे नेते  मरियूर रामदास गणेश आणि मरियूर रामदास स्वामीनाथन या ‘हेलिकॉप्टर बंधूं’वर ६०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. ते दोघेही फरार असल्याने जागोजागी पोस्टर लावण्यात आले आहेत.

 

पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर कंपनीचा व्यवस्थापक श्रीकांत याला अटक करण्यात आली आहे. वादानंतर भाजपाने गणेशला पदावरून काढून टाकलं आहे.

 

तिरूवरूरचे निवासी असलेले ‘हेलिकॉप्टर बंधू’ सहा वर्षांपूर्वी कुंभकोणम येथे राहण्यास आले होते. तिथे ते डेअरीचा व्यवसाय करत होते. त्यानंतर दोघांनी सिंगापूर आणि अन्य देशात आपला व्यवसाय वाढवला.  दोघा भावांनी मिळून विक्ट्री फायनान्स नावाची कंपनी सुरु केली. २०१९ मध्ये अर्जुन एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड नावाने कंपनी रजिस्टर केली. या कंपनीच्या माध्यमातून पैसे दुप्पट करण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली.

 

“दोघां भावांनी मागच्या काही वर्षात कंपनीत गुंतवलेले पैसे १२ महिन्यात दुप्पट करून दिले. मात्र त्यानंतर जास्त पैसे गुंतवणूक करण्याची लालसा लागल्यानंतर अनेकांची फसवणूक केली. यासाठी त्यांनी अनेक दलालांची नियुक्ती केली होती. दलालांना जास्तीत जास्त कमिशन दिलं जातं होतं. त्यामुळे अनेक व्यावसायिक आणि श्रीमंत व्यक्तींनी आमिषाला बळी पडत कंपनीत गुंतवणूक केली.”, असं पोलिसांनी सांगितलं आहे. “मागच्या वर्षी लोकांनी पैसे मागण्यास सुरुवात केल्यानंतर कंपनीला कोरोनामुळे नुकसान होतं असल्याचं सांगण्यात आलं. मात्र पैसे मिळत नसल्याचं दिसताच काही गुंतवणूकदारांना शंका आली आणि त्यांनी पोलिसात धाव घेतली”, असंही पोलिसांनी पुढे सांगितलं.

 

जफरुल्लाह आणि फैराज बानो या दांमत्याचीही फसवणूक झाली आहे. त्यानी पोलिसात तक्रार दिली आहे. “आम्ही त्यांच्या फायनान्स कंपनीत १५ कोटी जमा केले होते. मात्र आमचे पैसे मिळाले नाहीत. पैशांची मागणी केली तेव्हा त्यांनी आम्हाला धमकी दिली”, असं दांमत्याने सांगितलं आहे.  पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ४०६, ४२० आणि १२० ब अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 

Protected Content