….. तर राज्य केंद्राच्या ताब्यात देऊन टाका —- चंद्रकांत पाटील

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । प्रत्येक गोष्टीसाठी केंद्र सरकारलाच जबाबदर धरलं जाणार असेल तर मग राज्य केंद्राच्या ताब्यात देऊन टाकावे असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

 

महाविकासआघाडी प्रत्येक गोष्टीसाठी केंद्रालाच जबाबदार धरणार असेल तर ते राज्य तरी का चालवत आहेत? अशी विचारणाही   त्यांनी केली. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा उल्लेखही यावेळी त्यांनी केला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.   त्यांनी पुढील १५ दिवसांत अजून दोन मंत्र्यांवर राजीनाम्याची वेळ येईल असा दावा केला.

 

“मी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असे म्हणत नाही. पण आता तुम्ही राष्ट्रपती राजवट लागू न करण्यासाठी काय शिल्लक ठेवले आहे?,” अशी विचारणा चंद्रकांत पाटील यांनी केली. अगदी १८ महिन्यांपूर्वीच्या सरकार स्थापनेपासून महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस निराशेकडे गेला आहे असं ते म्हणाले.

 

“वाझे प्रकरणात राजीनामे होतील, चौकशी होईल, कदाचित एक वेळ अटकही होईल, पण यामुळे प्रश्न सुटणार नाहीत. ही संघटीत गुन्हेगारी आहे आणि संघटीत गुन्हेगारीला मोक्का कायदा लागतो. त्यामुळे आमची मागणी आहे की, पुरावे समोर आल्यास संबंधितांना मोक्का कायदा लावावा,” असे ते म्हणाले

 

 

 

 

 

दरम्यान गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलीस दलातील संघाशी संबंधित अधिकाऱ्यांचा शोध घेतला जाईल केलेल्या वक्तव्यावरुन त्यांनी टीका केली. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही दहशतवादी संघटना आहे का? लातूरचा भूकंप असो किंवा कोल्हापुरातील पूरपरिस्थिती प्रत्येकवेळी संघ मदतीसाठी धावला आहे. तुमच्या राजकीय वादात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ओढू नका,” असं ते म्हणाले.

Protected Content