ठाकरे व पवार हे महाराष्ट्राचे दोन स्वाभीमानी ब्रँड : राऊत

मुंबई, । जगाची नव्हे तर, मुंबई ही महाराष्ट्राच्या बापाची असल्याचे ठणकावत खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात ठाकरे आणि पवार हे दोन स्वाभीमानी ब्रँड असून मुंबईतून या ब्रँडना नष्ट करून मुंबईवर ताबा मिळवायचे कारस्थान सुरू असल्याची टीका केली आहे.

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनातील रोखठोक या आपल्या साप्ताहिक स्तंभात आज मुंबई विरोधकांना धारेवर धरले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राची राजधानी मुंबईस ग्रहण लावण्याचे प्रयत्न पुन्हा सुरू झाले आहेत. हे ग्रहण उपरे लावत आहेत. पण त्यांना बळ देण्यासाठी परंपरेप्रमाणे आपल्यातलेच घरभेदी सरसावले आहेत. मुंबईला आधी पाकिस्तान, नंतर बाबर म्हणणार्‍यांच्या मागे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष उभा राहतो हे दुर्दैवच म्हणायला हवे. मुंबईविरोधात ६०-६५ वर्षांपूर्वी काँग्रेसच्या काही नेत्यांनी पद्धतशीर कारस्थाने केली. त्या कारस्थानांच्या छाताडावर पाय ठेवून मराठी माणसाने संयुक्त महाराष्ट्राचा भगवा झेंडा फडकवला. काँग्रेसने म्हणजे मोरारजी देसाई यांनी गोळीबार केला त्याच्या निषेधार्थ केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा राजीनामा पंडित नेहरूंच्या तोंडावर फेकणारे चिंतामणराव देशमुख हेसुद्धा तेव्हा काँग्रेसवालेच होते व महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस नेते संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे सक्रिय समर्थक होते.

यात पुढे म्हटले आहे की, दिल्ली किंवा महाराष्ट्रात कोणाचेही सरकार असो, एखादी अज्ञात शक्ती आमच्या मुंबईच्या विरोधात पद्धतशीरपणे कारस्थाने करत असते. पण संयुक्त महाराष्ट्रासाठी तुरुंगाच्या दारात रांग लावणारा मरगट्टा आज निप्रभ झाला काय? आज पुन्हा मराठी माणसाचे आणि अस्मितेचे पद्धतशीर खच्चीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्राच्या रक्तातील मराठी पेशी मारण्याचे कारस्थान सुरू आहे. सूर्य, चंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही हे शब्द उच्चारताच वणव्याप्रमाणे पेटून उठणारा मराठी माणूस कायमचा लाचार करण्याचे षड्यंत्र नव्या राजकारणात रचले गेले आहे. मुंबईतून लॉक डाऊन काळात लाखो मजूर आपापल्या राज्यांत परत गेले. त्यातले बहुसंख्य मजूर पुन्हा मुंबईत परत आले. मुंबई त्यांच्यासाठी रोजीरोटी देणारे शहर आहे. या शहराबाबत हा श्रमिक वर्ग कृतज्ञ आहे.

मुंबईच्या जडणघडणीत श्रमिकांचे योगदान मोठे आहे. मुंबई मूळची कोळी, आगरी, भंडारी, पाचकळशी, पाठारे प्रभू वगैरे समाजाची असेल. म्हणजेच मराठी माणसाची असेल; पण तिला धनकनक संपन्न आम्हीच केले, ही घमेंड, अहंकार मुंबईतील शेठ लोकांत तेव्हाही होता, आजदेखील आहेच. हीच घमेंड उतरवण्याचे काम सर्वांत आधी शिवसेनेने केले. महाराष्ट्राचा अवमान केला म्हणून दिल्लीतील एकाही मराठी केंद्रीय मंत्र्यास वाईट वाटले नाही तेथे संतापून राजीनामा वगैरे देण्याची बातच सोडा. ठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रॅण्ड पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ब्रॅण्डचे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल असा इशारा यात देण्यात आला आहे.

मुंबईने प्रत्येकाला दिले आहे. पण मुंबईबाबत कृतज्ञता व्यक्त करताना अनेकांना यातना होतात. जगभरातील श्रीमंतांची घरे मुंबईत आहेत. मुंबईचा अवमान होत असताना ते सगळेच खाली मान घालून बसतात. मुंबईचे महत्त्व फक्त ओरबाडण्यासाठी व पैसे कमवण्यासाठीच आहे. मग मुंबईवर कोणी रोज बलात्कार केला तरी चालेल. या सगळयांनी एक लक्षात घेतले पाहिजे, ठाकरे यांच्या हाती महाराष्ट्राची सूत्रे आहेत. त्यामुळे रस्त्यावर उतरून मराठी अस्मितेसाठी राडे करण्याची आज गरज नाही. महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे भाग्यचक्र मुंबईभोवतीच फिरत आहे. मुंबई देशाची असेल नाहीतर जगाची, पण तिच्यावर पहिला हक्क महाराष्ट्राचा आहे. जेव्हा जेव्हा मुंबईला डिवचले तेव्हा तेव्हा महाराष्ट्राने प्रतिकार केला. यात काही चुकत असेल तर पंतप्रधान मोदी यांनीच सांगावे! असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

Protected Content