टोळीने गुन्हे करणाऱ्या ३ गुन्हेगारांना २ वर्षांसाठी हद्दपार

जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । टोळीने जळगाव शहरात गंभीर गुन्हे करणाऱ्या तीन गुन्हेगारांवर २ वर्षांसाठी जळगाव जिल्हयातून हद्दपार करण्याचे आदेश  जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी काढले आहे. स्वप्नील उर्फ गोलु धर्मराज ठाकुर (वय १९) निशांत प्रताप चौधरी (वय १९, दोन्ही रा. शंकरआप्पा नगर) आणि कुणाल उर्फ दुंडया किरण कोळी (वय-१९, रा. कुसुंबा) असे हद्दपार केलेल्या तिन्ही गुन्हेगारांचे नाव आहे

याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील स्वप्निल उर्फ गोलू ठाकूर याच्यासह साथीदार निशांत चौधरी व कुणाल उर्फ दुंड्या कोळी यांच्याविरुद्ध एमआयडीसी व रामानंदनगर पोलीस स्टेशनला दरोड्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत, घातक हत्यार बाळगणे, अश्लिल शिवीगाळ करणे, घातक हत्याऱ्याने दुखापत, दमबाजी करणे असे ८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांपैकी पाच गुन्हे त्यांनी टोळीने केले आहेत. ही टोळी शहरात दहशत पसरवित असून त्यामुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण झाले आहे. तसेच शहरात सार्वजनीक शांतता सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी त्यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन सुध्दा त्यांचे वर्तनात सुधारणा झालेली नाही.

त्यामुळे टोळीच्या हद्दपारीचा प्रस्ताव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सफौ अतुल वंजारी, पोना सचिन पाटील, योगेश बारी, सुधीर साळवे, साईनाथ मुंडे, मपोकॉ निलोफर सैययद यांनी तयार करुन तो जिल्हा पोलीस अधीक्षक याच्याकडे पाठविला होता. चौकशीनंतर पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी तीनही गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश गुरुवारी १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी काढले आहे. या हद्दपार प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  किसन नजन पाटील यांच्यासह त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार सफौ युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल दामोदरे यांनी पाहिले आहे.

Protected Content