टोपेंच्या राजीनाम्याची सोमय्यांची मागणी

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  ठाकरे सरकारने प्रतिष्ठेची मुद्दा न बनवता केंद्र सरकार, लष्कराची मदत घ्यावी. सर्व कोव्हिड केंद्रामधील ऑक्सिजन आणि फायर ऑडिट तातडीने करा . आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा राजीनामा घ्या ” असं मत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी व्यक्त केलं आहे.

 

 

महाराष्ट्रामध्ये कोव्हिडचा मृत्यूतांडव सुरु आहे, अशा शब्दांमध्ये भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी विरारमधील घटनेबद्दल  म्हटलं आहे. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीत १३ रुग्णांना जीव गमवावा लागला. मध्यरात्री आयसीयूमध्ये लागलेल्या आगीत रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत सोमय्या यांनी सध्याची परिस्थिती पाहता ठाकरे सरकारने प्रतिष्ठेचा मुद्दा बाजूला ठेऊन केंद्र सरकारची मदत घेतली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही सखोल चौकशीची मागणी केलीय.

 

देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विटरवरुन विरारमधील घटनेसंदर्भात प्रतिक्रिया दिलीय. “ विरारमधील कोव्हिड रुग्णालयामधील आयसीयूला लागलेल्या आगीत काही जणांचा मृत्यू झाल्याचं समजल्याने  दु:ख झालं रुग्णांच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो. सखोल चौकशी करावी अशी आमची मागणी असून यासाठी कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी,” असं फडणवीस म्हणाले आहेत.

 

 

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात लागलेलेली आग ही एसीचा स्फोट झाल्याने लागली असल्याची माहिती डॉक्टर दिलीप शाह यांनी दिली. रुग्णालयात सेंट्रलाइज एसी असून दोनच मिनिटात आग सगळीकडे पसरली अशी माहिती त्यांनी दिली . रात्री ३ वाजता लागलेल्या आगीनंतर रुग्णालयात धावपळ सुरु झाली होती. आयसीयूमध्ये  १७ रुग्ण होते. यामधील चौघे जे चालू शकत होते त्यांनी स्वत:ची सुटका करुन घेतली. मात्र इतर रुग्ण जीव वाचवू शकले नाहीत  घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस दाखल झाले होते. काही वेळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळालं

 

रुग्णालयात  ९० रुग्ण दाखल होते. आग लागल्यानंतर ऑक्सिजनवर असणाऱ्या तसंच गंभीर प्रकृती असणाऱ्यांना इतर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. २१ रुग्णांना इतरत्र हलवण्यात आलं असून यामध्ये चार महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं रुग्णालयाने सांगितलं आहे.

Protected Content