जे संवेदनशील आहेत, ते सगळे मरणार; फक्त राजकारणी जिवंत राहणार — प्रवीण तरडे

 

 

 मुंबई : वृत्तसंस्था । जे जे संवेदनशील, सर्जनशील आहेत, ते सगळे मरणार आणि फक्त राजकारणाशी संबंधित लोक जिवंत राहणार , असा संताप चित्रपट  दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी व्यक्त केला आहे  .

 

एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं पुण्यात स्वप्निल लोणकर या तरुणाने मृत्यूला कवटाळलं. स्वप्निलच्या आत्महत्येनंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर भडकलेल्या मराठी दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी राजकारण्यांवर टीकास्त्र डागलं. “हा पक्ष त्या पक्षाशी युती करणार, या पक्षाचा नेता, त्या पक्षाला जाऊन भेटला, अशा दररोज चर्चा सुरू आहेत. या सगळ्यांसाठी वेळ आहे आणि इथे तरुण पोरं मरताहेत त्यांना नोकऱ्या देण्यासाठी वेळ नाहीये का? १२-१३ आमदारांच्या नियुक्त्या होण्यासाठी दररोज राज्यपालांकडे जाताहेत आणि यांना वेळ नाहीये… दिल्लीत हेच चाललंय, महाराष्ट्रात हेच चालू आहे. सगळ्या भारतात हेच सुरू आहे. मग राजकारण्यांनीच जगायचं का?,” असा थेट सवाल तरडे यांनी राजकारण्यांना केला.

“फुटपाथच्या कामातून पैसै खाणाऱ्या, त्यासाठी रस्ते उकरणाऱ्या या माणसांना आपण देशाचे आणि राज्याचे आयडॉल करून बसलोय… मग असेच तरुण मरणार! एपीएससी-युपीएससी करणारे मरणार, शेतकरी मरणार, कलाकार मरणार, लेखक मरणार. काल एक कलादिग्दर्शक मेला. जे जे संवेदनशील, सर्जनशील आहेत, ते सगळे मरणार आणि फक्त राजकारणाशी संबंधित लोक जिवंत राहणार. त्यांच्याबद्दल काही बोलायला जावं तर ट्रोल करतात. ट्रोल करणाऱ्यांना हे माहिती नाहीये की, एक दिवस आपल्याच घरातील कुणीतरी मरणार आहे. या देशात आणि राज्यात सुखी फक्त हेच (राजकारणी) लोक जिवंत राहणार आहेत,” अशी खंत प्रविण तरडे यांनी व्यक्त केली.

यावेळी तरडे यांनी तरुणांनाही आत्महत्येच्या विचारांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले, “अभ्यास करून आणि आईबापांची स्वप्न पाहून तुम्ही इथपर्यंत आला आहात. कुठल्यातरी फालतू सिस्टिमसाठी स्वतःचा अमूल्य जीव वाया घालवू नका. संयम ठेवा आणि प्रशासकीय सेवेत जाऊन यांना उघडं पाडा,” असं ते म्हणाले.

“आत्महत्या करून नका. तुम्ही आत्महत्या केल्यानं या गेंड्याची कातडी असणाऱ्या लोकांना काहीच फरक पडणार नाही. फरक पडेल, तो तुमच्या आईबापाला. तुमचीच आई रडतेय. ज्यांच्या सिस्टिमला तुम्ही कंटाळून आत्महत्या केली; ते नवीन राजकारण, नवीन मित्र करण्यात गुंतले आहेत. या पक्षातून त्या पक्षात उड्या मारून त्यांचं भविष्य सेटल करण्यात गुंतले आहेत. त्यांच्या नातेवाईकांना राजकारणात आणून मोठं करण्यात गुंतले आहेत. पुण्यात ज्या पक्षाने गर्दी केली, त्याच्यावर टीका करणारे आज त्यांच्याच मांडीला-मांडी लावून बसलेत. यांना लाज कशी वाटत नाही. तरुण मरतोय आणि हे मजा करत आहेत. त्यामुळे आपल्या आईबापाचा चेहरा डोळ्यासमोर आणा. गोठ्यात बांधलेल्या गुरांचा चेहरा डोळ्यासमोर आणा. त्या गुरांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं असेल, पण या माणसांच्या डोळ्यात येणार नाही,” असा संताप प्रविण तरडे यांनी व्यक्त केला.

 

Protected Content