चोपडा, प्रतिनिधी | राज्य सरकारने आशा व गटप्रवर्तक यांच्या मानधनात गेल्या सप्टेंबर महिन्यात अनुक्रमे दोन हजार रुपये व अडीच हजार रुपये वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. ही वाढ अद्यापपावेतो देण्यात आलेली नाही. म्हणून या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी जळगाव येथे २९ जानेवारी रोजी सकाळी ११.०० वाजता महात्मा गांधी उद्यानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून तिथे धरणे आंदोलन केले जाणार आहे.
अंगणवाड्यांचा खाऊ वाटपाचे बचत गटांचे कंत्राट पूर्वीप्रमाणे सुरू ठेवावे, ई टेंडर रद्द करावे, त्यांना गहू, तांदूळ, गॅस, सरकारमान्य व स्वस्त दरात मिळावे. या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व आशा गटप्रवर्तक व अंगणवाड्यांचे औषध देणारे बचत गट यांनी यावेळी हजर राहावे, असे आव्हान संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमृतराव महाजन, सुलोचना साबळे, मीनाक्षी सोनवणे, मनीषा पाटील, प्रतिभा पाटील, प्रतिज्ञा पाटील मोरे, शारदा महाजन, सांद्या बोरसे, यमुनाबाई धनगर, वंदना पाटील, सुशीला पाटील, विद्या पाटील, सुरेखा माळी, कल्पना खंबाईत, जिजाबाई राणे, जयश्री माळी, सरलाबाई कोळी, जयश्री चौधरी, अशोक पाटील, लताबाई पाटील, मंगलाबाई शिवदे आदींनी केले आहे.