जलसंपदा मंत्री असूनही पाडळसरे प्रकल्पाकडे दुर्लक्ष ; गिरीश महाजनांवर खडसे यांनी फोडले खापर

 

जळगाव : प्रतिनिधी । गिरीश महाजन हे फडणवीस सरकारमध्ये जलसंपदा मंत्री होते. मात्र तरीही त्यांनी जळगाव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच अमळनेर तालुक्यातील पाडळसरे  येथील निम्न तापी प्रकल्प रखडला, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे

 

भाजप सोडून राष्ट्रवादीत दाखल झालेले ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा प्रतिस्पर्ध्यावर निशाणा साधला. भाजपचे संकटमोचक नेते अशी ख्याती असलेले माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर खडसेंनी टीकास्त्र साधलं.

जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील प्रकल्पाची पाहणी करणार आहेत. यावेळी एकनाथ खडसे यांनी प्रकल्पाच्या ठिकाणी उपस्थिती लावली, यावेळी ते बोलत होते.

 

 

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर गिरीश महाजन जोरदार कामाला लागले आहेत. त्यांच्याकडून पक्षबांधणीचे काम वेगात सुरु आहे. “राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांना काय मिळतं हा खडसे आणि राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. एकनाथ खडसे यांनी आमचा पक्ष सोडला आणि आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पक्ष सोडून कुणी जाणार नाही, जे हौशे गवशे आहेत तेच जातील” असा टोला गिरीश महाजनांनी काही दिवसांपूर्वी लगावला होता.

 

“आता मी भाजपला ताकद दाखवून देतो. उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच असेल” अशी गर्जना एकनाथ खडसे यांनी केली आहे. “जळगावात भाजपचे अनेक कार्यकर्ते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. हे कार्यकर्ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील”, असा इशाराही एकनाथ खडसे यांनी दिला होता.

Protected Content