चीनने अपहरण केलेले भारतीय युवक गुप्तहेर असल्याचा कांगावा

 

बीजिंग, वृत्तसंस्था । लडाखमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनमधील सरकारी माध्यमांकडून भारताविरोधात फुत्कार सुरू आहेत. अरुणाचल प्रदेशमधून चीनने पाच भारतीय युवकांचे अपहरण केल्याचे समोर आले. त्यानंतर आता चीनने हे युवक गुप्तहेर असल्याचा दावा केला आहे. हे पाचही तरूण भारतीय गुप्तचर संस्थेचे सदस्य होते आणि स्वत: ला शिकारी असल्याचे सांगत होते, असा दावा चीनने केला आहे. या युवकांची सुटका करण्यात येणार असून आज भारताकडे त्यांना सोपवले जाणार असल्याची माहिती भारतीय लष्कराच्यावतीने देण्यात आली.

चीन सरकारच्या मालकीचे वृत्तपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स’चे संपादक हू शिजिन यांनी सांगितले की, भारताचे पाच गुप्तचर शिकारी म्हणून चीनच्या हद्दीत शिरले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून चीनच्या तिबेटमधील शन्नान प्रीफेक्चरमध्ये हेरगिरी करण्यास शिरले होते. या गुप्तचरांना चीनने ताब्यात घेतले. या पाचही जणांना इशारा दिला आहे. त्याशिवाय शिक्षाही ठोठावण्यात आली असून लवकरच त्यांची सुटका होणार असल्याचे त्यांनी म्हटले.

चीनने भारतीय युवकांचे अपहरण केले असल्याचे सातत्याने म्हटले. मात्र, चीनकडून हे आरोप फेटाळण्यात आले. भारताच्या दबावानंतर मात्र काही दिवसांनी चीनच्या लष्कराने हे पाच भारतीय युवक ताब्यात असल्याची कबुली दिली. या युवकांची सुटकाही लवकरच करण्यात येईल असेही चीनने स्पष्ट केले. अरुणाचल प्रदेशमधील सुबनसिरी जिल्ह्यातील भारत-चीन सीमेवरील जंगलात गेलेल्या सात पैकी पाच युवकांचे चिनी सैन्याने अपहरण केले होते. प्रकाश रिंगलिंग या व्यक्तीने सोशल मीडियावर ही बाब समोर आणली. प्रकाशच्या भावाचेही अपहरण करण्यात आले होते. टोच सिंगकम, प्रसात रिंगलिंग, डोंगटू एबिया, तनु बाकेर आणि गारू डिरी अशी या युवकांची नावे आहेत. या युवकांना आता चीन भारताकडे सुपूर्द करणार आहे. भारतीय लष्कराच्यावतीने ही माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिन यांना पाच युवकांच्या अपहरणाबाबत विचारले असता, त्यांनी मूळ प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी अरुणाचल प्रदेश आमचाच प्रदेश असल्याचा दावा केला. चीनने कधीही अरुणाचल प्रदेशला मान्यता दिली नाही. हा भूभाग चीनच्या दक्षिण तिबेटचा भाग आहे. अपहरण झालेल्या युवकांबाबत भारतीय लष्कराने चीनच्या सैन्याकडे विचारणा केली असल्याचे वृत्त होते. मात्र, याबाबत आपल्याला फारशी माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

लडाखसह अरुणाचल प्रदेश आणि इतर भागावर चीन आपला दावा सातत्याने सांगत आला आहे. अरुणाचल प्रदेशमधील तवांग हा तिबेटीयन बौद्धधर्मीयांसाठी सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. चीन या भागाला दक्षिण तिबेटचा भाग मानतो. त्यामुळे चीनकडून सातत्याने अरुणाचलवर दावा करण्यात येतो.

Protected Content