चिदंबरम यांचे दिल्ली सरकारवर टिकास्त्र

नवी दिल्ली । दिल्ली सरकारने कन्हैया कुमार याच्या विरोधात राजद्रोहाचा खटला चालण्याला मंजुरी दिल्याने या निर्णयावर काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी टीका केली आहे.

जेएनयूमध्ये घोषणाबाजी केल्याचा एक व्हिडिओ ९ फेब्रुवारी २०१६ ला समोर आला होता. या व्हिडिओत कथिक स्वरुपात देशविरोधी घोषणाबाजी करण्यात आली होती. हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थी संघटनेचा तत्कालीन अध्यक्ष कन्हैया कुमार आणि इतरांव राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता. परंतु, पटियाला हाऊस कोर्टातील सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने या खटल्यासाठी दिल्ली सरकारकडून परवानगी मिळाली नसल्याची माहिती कोर्टाला दिली होती. यावरून त्यावर दिल्ली सरकारची भूमिका काय आहे ते स्पष्ट करावे,असे निर्देश कोर्टाने दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेला दिले होते. विशेष शाखेने पत्र पाठवल्यानंतर आता सरकारने राजद्रोहाचा खटला चालवण्याची अनुमती दिली आहे. यामुळे आता कन्हैया कुमारविरोधात राजद्रोहाचा खटला चालणार आहे.

दरम्यान, या निर्णयावरून माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी आज एक ट्विट करत दिल्ली सरकारवर टीका केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, ”राजद्रोहाच्या कायद्याबाबत केंद्र सरकारप्रमाणेच दिल्ली सरकारला देखील समज कमी आहे. मी भारतीय दंड विधान (आयपीसी) कलम १२४ अ आणि १२० ब अंतर्गत कन्हैया कुमार याच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून खटला चालवण्यास मंजुरी देण्याला मी तीव्र विरोध करत आहे” असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.

Protected Content