घनकचरामुक्त शहरांमध्ये जळगावसह जामनेर, रावेर, वरणगाव शहरांचा समावेश

जळगाव प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरामुक्त शहरांमध्ये देशातील १४१ शहरांना तारांकित मानांकन मिळाले असून एकट्या महाराष्ट्रातील ७६ शहरांचा यात समावेश आहे. यात तीन तारांकित मानांकनात जळगाव शहराचा तर एक तारांकित मानांकनात जामनेर, रावेर, वरणगाव या जळगाव जिल्ह्यातील शहरांचा समावेश आहे.

याबाबत वृथ्त असे की, केंद्र शासनाच्या नागरी विकास ,गृहनिर्माण व गरीबी उन्मूलन मंत्रालयाकडून देशभर राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत २०१८ पासून कचारामुक्त शहरांना विविध मानकांच्या आधारावरील चाचण्यानंतर तारांकित शहरांचा बहुमान मिळतो . केंद्रीय नागरी विकास ,गृहनिर्माण व गरीबी उन्मूलन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीपसिंह पुरी यांनी मंगळवारी वर्ष २०१९-२० साठी निवडण्यात आलेल्या कचरामुक्त तारांकित शहरांचा निकाल जाहीर केला. विभागाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

कचरामुक्त शहरांच्या तारांकित मानांकनासाठी देशभरातील ४ हजार ३७२ शहरांपैकी १४३५ शहरांनी आवेदने पाठविली होती. यापैकी डिजिटल एमआयएस चाचणीत ६९८ शहर बाद ठरली. उर्वरित ७३७ शहरांमध्ये नागरिकांचे मत व मंत्रालयाच्या अधिकार्‍यांकडून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून त्यांची एकूण २० मानकांआधारे चाचणी करून अंतिम १४१ शहरांची निवड करण्यात आली. यात महाराष्ट्रातील ७६ शहरांनी बाजी मारली आहे. देशातील ६ शहरांना पंचतारांकित मानांकन देण्यात आले असून यात नवी मुंबई महानगर पालिकेने बहुमान मिळविला आहे. देशातील ६५ शहरांना तीन तारांकित शहरांचा मान मिळाला असून राज्यातील ३४ शहरांचा यात समावेश आहे. देशभरातील ७० शहरांना एक तारांकित शहरांचा मान मिळाला असून राज्यातील ४१ शहरांचा यात समावेश आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापनात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका खालील प्रमाणे.

पंचारांकित मानांकन

नवी मुंबई महानगर पालिका

तीन तारांकित मानांकन

अंबरनाथ,भिवंडी निजामपूर, ब्रह्मपुरी,चंद्रपूर, देवळाळी प्रवरा, धुळे, गडहिंगलज, इंदापूर, जळगाव, जालना, जेजुरी, जुन्नर, कागल, क-हाड, खेड, लोणावळा, महाबळेश्‍वर, मलकापूर, माथेरान, मौदा, मिराभाईंदर, मुर्गुड, नरखेड, पाचगणी, पन्हाळा, राजापूर, रत्नागिरी, आसवड, शिर्डी ,तासगाव, ठाणे, वडगाव, वेंगुर्ला आणि विटा

एक तारांकित मानांकन

अहमदनगर, अकोला, अंजनगाव सुर्जी, आष्टा, बल्लारपूर, बार्शी, भगूर, दौंड, गेवराई, जामनेर, जव्हार, कल्याण-डोंबिवली, खानापूर, खापा, खोपोली, कुळगाव-बदलापूर, कुरुंदवड, महाड, मलकापूर, मंगळवेढे, मुरबाड, नागभीड, नाशिक, पैठण, पनवेल, पेण, फुलंब्री, राजुरा, रामटेक, रावेर, सेलू, संगमनेर, शहादा, शेंदूरजनाघाट, शिरपूर-वरवाडे, उरन, इस्लामपूर, विजापूर, वरणगाव, वसई-विरार आणि वाळूज.

राज्य शासनाने घनकचरा स्ववस्थापनाबाबत आखलेले ठोस धोरण आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरामुक्त शहरांमध्ये देशात आपले वर्चस्व निर्माण केले आहे. स्वच्छ सर्वेक्षणासाठी देण्यात येणार्‍या एकूण गुणांपैकी २५ टक्के म्हणजे ६००० पैकी १५०० गुण हे केवळ कचरामुक्तीसाठी देण्यात येत असल्याने तारांकित मानकांला विशेष महत्त्व असून यात महाराष्ट्राची सरशी पाहता येत्या काळात स्वच्छ सर्वेक्षण निकालातही महाराष्ट्र अग्रेसर ठरू शकतो.

Protected Content