ग्रामसंवाद सरपंच असोसिएशनची पाचोऱ्यात राज्य बैठक

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | सरपंचांच्या विविध मागण्या व समस्यांवर चर्चा तसेच नवीन कार्यकारिणीची निवड करण्यासाठी पाचोरा येथे राज्यातील ग्रामसंवाद सरपंच असोसिएशनची पदाधिकारी बैठक रविवारी पाचोरा येथील आशीर्वाद हॉलमध्ये संपन्न झाली.

सरपंचांनी आपल्या अधिकारांचा योग्य वापर करून लोकाभिमुख कार्य केल्यास ग्रामीण भागाचा कायापालट करणे शक्य असून यासाठी सरपंच बांधव भगिनींनी योग्य तो अभ्यास करून आदर्श ग्राम निर्मितीसाठी प्रयत्न करावेत शिवाय महिला सरपंचांनी क्रियाशील होणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी महिला सरपंचाचे पतीच गावचा कारभार करतात, हे चुकीचे असून, महिला सरपंचांनी देखील स्वतः चे अधिकार समजून घेत गावगाडा हाकावा असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात केले.

यावेळी आमदार किशोर पाटील यांनी सांगितले की, खेड्याकडे चला गावाकडे चला, असे म्हणण्यासारखे काम सरपंचांनी गावासाठी करून दाखवावे. सरपंचांनी स्वतःचा अधिकार समजून घेतल्यास गावचा विकास होऊ शकतो. यासाठी आदर्श गावाचे अण्णा हजारे, पोपटराव पवार, भास्कर पेरे यांचे अनुकरण सरपंचांनी करायला हवे. सरपंचांच्या समस्या व अडचणी याबाबत असलेले निवेदन थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे लवकरच सादर करून सरपंच व मुख्यमंत्री यांच्यात बैठक घेतली जाईल. असे आश्वासन किशोर पाटील यांनी दिले. सूत्रसंचलन सुनिल वंजारी यांनी तर आभार निलेश पुलंगकर यांनी मानले. यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या सरपंचांना सन्मानित करण्यात आले.

बैठकीला आ. किशोर पाटील यांच्यासह ग्रामसंवाद सरपंच असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अजीनाथ धामणे, उपाध्यक्ष प्रमोद भगत, सचिव विशाल लांडगे, अजितसिंग राजपूत, महिला प्रदेशाध्यक्ष कल्याणी राजस, जिल्हा भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा पाटील, ग्राम संवाद सरपंच असोसिएशनचे तालुकाध्यक्ष डॉ. निळकंठ पाटील, राजुरीचे सरपंच राहुल पाटील, अतुल पाटील, ज्योती पाटील, सीमा पाटील, अजय महाजन, प्रदीप सोनवणे, नरेंद्र पाटील, समाधान पाटील, भगवान मोरे यांच्यासह महाराष्ट्रातील चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, बुलडाणा, औरंगाबाद, जळगाव आदी ठिकाणचे सरपंच या बैठकीला उपस्थित होते.

 

 

 

Protected Content