मुंबई : वृत्तसंस्था । कोरोना चाचणी न केल्याने २५ आमदारांना विधानभवनातून परत पाठवल्याचा दावा, सपा नेते अबू आझमी यांनी केला आहे.
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आज सादर होत आहे. मात्र सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं दिसत आहे. अबू आझमी म्हणाले, “माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह २५ आमदारांना कोरोना टेस्ट न केल्यानं प्रवेश दिला गेलेला नाही. दुसऱ्यांदा कोरोना टेस्ट करण्याची माहिती त्यांना दिलेली नव्हती.संवांदाचा अभाव इथं दिसतोय. आज अर्थसंकल्पाचा दिवस असल्यानं त्यांना विधानभवनात बसण्याची परवानगी द्यायला हवी होती”
सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील काही आमदारांना माघारी जावे लागले. कोव्हिड टेस्ट केली नसल्याने त्यांना परत पाठविण्यात आले आहे १० आमदारांनी आतापर्यंत आर टी पी सी आर टेस्ट केली आहे. त्याचा रिपोर्ट आल्यावर त्यांना सभागृहात सोडण्यात येणार आहे
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी अधिवेशनाला हजर राहणाऱ्या आमदार, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार अशा सर्वांची कोरोना चाचणी करणे बंधनकारक होतं. एका आठवड्यात सलग चार दिवस अधिवेशनाचे कामकाज चालवायचे. यानंतर तीन दिवस सुट्टी द्यायची. त्यानंतर अधिवेशनाच्या पुढील आठवड्यात कामकाज सुरु करण्यापूर्वी पुन्हा एकदा सर्वांची कोरोना चाचणी करायची. यामुळे जर तीन दिवसांच्या कालावधीत कोणाला कोरोनाची लागण झाली, तर त्यांना अधिवेशनात येण्यापासून रोखता येईल. अशा पद्धतीने आठवड्यातून चार दिवस कामकाज आणि तीन दिवस सुट्टी या फॉर्म्युल्यानुसार तीन ते चार आठवडे अधिवेशन चालवता येईल, असं नियोजन राज्य सरकारने केलं होतं.
दरम्यान शुक्रवारी सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर शनिवार, रविवार सुट्टी होती. त्यानंतर आज सोमवारी अधिवेशन सुरु झालं. त्यावेळी आमदारांनी पुन्हा टेस्ट करणे आवश्यक होतं. मात्र काही आमदारांपर्यंत हा मेसेज न पोहोचल्याने त्यांनी पुन्हा चाचणी न करता अधिवेशनाला हजेरी लावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना परत पाठवण्यात आलं