कमलनाथ सरकार पाडण्यात पंतप्रधान मोदींचा हात

 

 

भोपाळ : वृत्तसंस्था । भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी इंदोरमध्ये एका जाहीर सभेत एक धक्कादायक खुलासा केलाय. ‘मार्च २०२० मध्ये कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार पाडण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती’ असं त्यांनी सभेत उपस्थितांसमोर म्हटलंय.
त्यामुळे, काँग्रेसकडे टीकेची थेट संधीच चालून आलीय.इंदोरमध्ये भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी संमेलनाला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलंय.

‘तुम्ही कुणाला सांगू नका, मी आजपर्यंत ही गोष्ट कुणाला सांगितली नाही. पहिल्यांदाच या मंचावरून ही गोष्ट जाहीर करत आहे की कमलनाथ यांचं सरकार पाडण्यात जर कुणाची महत्त्वपूर्ण भूमिका होती तर ती नरेंद्र मोदी यांची होती, धर्मेंद्र प्रधान यांची नाही’ असं म्हणणाऱ्या कैलाश विजयवर्गीय यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

यावेळी, केंद्रीय पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅसमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा हेदेखील उपस्थित होते.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं काँग्रेस सरकार पाडण्याचा निर्णय केलाय, असं जून महिन्यात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पक्ष कार्यकर्त्यांना कथिररित्या म्हटलं होतं.

 

मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलूजा यांनीदेखील विजयवर्गीय यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घटनात्मक पद्धतीनं निवडलेल्या सरकारला असंविधानिक पद्धतीनं पाडलं, हे आता स्पष्ट झालंय. काँग्रेसनं सुरुवातीपासूनच ही गोष्ट मांडलीय. भाजपकडून मात्र आत्तापर्यंत कमलनाथ सरकारला पाडण्यासाठी काँग्रेसचा अंतर्गत वाद जबाबदार असल्याचं कारण सांगितलं जात होतं. आता भाजप राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी स्वत:च ही गोष्ट स्पष्ट केलीय’, असं म्हणत सलूजा यांनी भाजप नेतृत्वावर टीका केलीय.

याच वर्षी मार्च महिन्यात करोना लॉकडाऊन सुरू होण्याआधीच ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या २२ साथीदारांसोबत (सहा मंत्र्यांचा समावेश) विधानसभा आणि कॉंग्रेसला राम राम ठोकत भाजपच्या गोटात सहभागी होण्याचा मार्ग स्वीकारला होता. बहुमत नसल्यानं मध्य प्रदेशात केवळ १५ महिन्यांत कमलनाथ सरकार कोसळलं होतं.

Protected Content